Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती. या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात असून परतवाडा-अमरावती महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरात आज प्रहार संघटनेने शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. परतवाडा येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे.
राज्यभरात चक्काजाम आंदोलन
दरम्यान, महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन होणार आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहेत, तर मच्छीमार, दिव्यांग, मेंढपाळ आदी घटकांच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र, सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडूंनी केला आहे. “आमचं आंदोलन आता सरकारच्या नियंत्रणात राहणार नाही. सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही,” असा घणाघात करत बच्चू कडूंनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात उग्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रहार संघटनेच्या आंदोलनाला जर विरोधकांची साथ मिळाली, तर हे आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूप धारण करू शकते, अशी भावना आंदोलक व्यक्त करत आहेत.
आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू
आंदोलनावेळी भाषणात बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. लुटलं तर कर्जमाफी द्यावीच लागेल. आता गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही. आत्महत्या केल्यापेक्षा लढा घेऊन बाहेर पडलं पाहिजे. जगात पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले पण इकडे वाढवले. भाव मिळाल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है. रमी खेळू खेळू युवक मरत आहे आणि तिकडे कृषिमंत्री विधानभवनात रमी खेळताय. पुढचं आंदोलन 29 तारखेला होणार आहे. वसंतराव नाईक यांच्या समाधी जवळ आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
पोलिसांकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड
नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे ही प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काल रात्री उशिरा नागपूर जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी रजनीकांत आतकरी यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट बच्चू कडू यांना फोन लावून पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली. यावेळी बच्चू कडू यांनीही कारवाई करायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत त्यांची कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा