Ajit Pawar : झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले आहेत. अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतलीय. या भेटीत अजित पवार आणि अमित शाहांमध्ये कोरेगाव जमीन गैरव्यवहारासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण झी 24 तासनं ही बातमी ब्रेक केल्यानंतर पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अजित पवारांची देखील दाणादाण उडल्याचं चित्र आहे.
झी 24 तासची बातमी, अजितदादांची धावाधाव?
बिहारच्या निकालानंतर रात्री 10 वाजता अजित पवारांनी दिल्लीत देशाचे गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. पुण्यातील कोरेगाव परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती. जमीन प्रकरणातील वस्तूस्थिती दादांनी शाहांसमोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. झी 24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत उमटल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील वर्षा बंगल्यावर जात भेट घेतली होती. दरम्यान या भेटीत देखील अजित पवारांनी फडणवीसांसोबत जमीन प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती होती. दरम्यान आता शाहांच्या भेटीतही याच प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय अंजली दमानियांनी व्यक्त केलाय. शाहांच्या भेटीनंतर प्रकरणाला दाबलं जात असेल तर ईडी, शाहांविरोधात याचिका करण्याचा इशारा अंजली दमानियांनी दिलाय. तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील अजित पवारांवर शरसंधान साधलंय. तर तिकडे अमित विजय वडेट्टीवारांनी देखील या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय.
वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांची मागणी. जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समिती मधील अधिका-यांचाही जमीन गैरव्यवहार प्रकरणात सहभाग, त्यामुळे समिती रद्द करा. स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी, आणि जबाबदार अधिका-यांवर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी.
झी 24 तासनं पुणे जमीन प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केलीय. दरम्यान याच प्रकरणी अजित पवारांनी अमित शाहांसोबत चर्चा केल्याची माहितीय. तर दुसरीकडे वडेट्टीवारांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.