Sanjay Raut On Raj Thackeray Meeting Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीवरुन वेगवेगळ्या शक्यता बोलून दाखवल्या जात असतानाच या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जळफळाट झाल्याची टीका शिंदेंच्या नेत्यांकडून केली जात आहे. या टीकेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.
शिंदे-राज भेटीसंदर्भात ठाकरेंशी काही बोलणं झालं का?
राज ठाकरेंनी शिंदेची भेट घेतली. या भेटीसंदर्भात तुमचं उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का? असा सवाल राऊत यांना विचारला. या प्रश्नावर राऊत यांनी थोड्याश्या चिडलेल्या स्वरातच, “बरं झालं असेल तर मी इथं कशाला सांगू? माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? मी कॅमेरावर का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं हा अंतर्गत विषय आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांच्या मदीतने चोरली. म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला न्यायप्रविष्ठ असून आम्ही तो जिंकू,” असं उत्तर दिलं.
आम्ही ते भांडण टोकाला नेऊ
पुढे बोलताना, “एकनाथ शिंदे आमचं भांडण आहे आणि राहील. ते भांडणं व्यक्तिगत नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं, हिताचं, नैतिकतेचं आहे. हे भांडण आम्ही टोकाला नेऊ. याउपर मी काही बोलायचं नाही. असं सांगूनही तुम्ही वारंवार हा प्रश्न विचारताय,” असं म्हणत राऊत पत्रकारांवरच चिडले.
मूर्ख लोक म्हणत राऊतांचा टोला
मैत्री अशी आहे की समोरच्याचा जळफळाट व्हावा, असं उदय सामंतांचं स्टेटमेंट आहे, असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. यावर संजय राऊतांनी, “कोण जळलं? त्यांचा रोख कोणावर असेल? त्यावर आमच्या पक्षाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? कोणी काही बोललं का? ते स्वत: जळत आहेत. त्यांच्या बुडाला आग लागली आहे. या विषयावर त्यांनी चर्चा करु नये. ते मूर्ख लोक आहेत,” असं म्हणत प्रश्न उडवून लावला.
राज्यसभेसंदर्भात राऊत काय म्हणाले?
राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार याबद्दल महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करुन निर्णय घेतील असं राऊतांनी म्हटलं आहे. शरद पवार या जागेसाठी उत्सुक असले तरी तिन्ही पक्ष एकत्र बसूनच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतली असं राऊतांनी पत्रकारांना सांगितलं.