Maharashtra Weather News : विदर्भापासून कोकण आणि मराठवाड्यापासून अगदी मुंबईपर्यंत राज्यात उष्ण वारे वाहण्यास सुरुवात झाली असून हा दाह सूर्य मावळतीला गेल्यानंतरही कमी होताना दिसत नाहीये. वाऱ्यांमध्ये उष्मा सायंकाळी आणि अगदी रात्रीसुद्धा जाणवत असल्यानं यंदाचा उकाडा नेमका किती तीव्र आहे याचीच प्रचिती येत आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महामुंबईसह लगतच्या परिसरात उष्णतेची लाट आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सोमवारप्रमाणंच मंगळवारीही महामुंबईला उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार असून, या लाटेचा विपरित परिणाम म्हणजे मुंबईचा पारा 38 ते 39 अंशांदरम्यान आणि ठाण्यात हाच आकडा 41 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कमाल तापमानात झालेली ही लक्षणीय वाढ पाहता मे महिन्याच्या विचारानंही अनेकांनाच घाम फुटत आहे. मुंबई शहरात कमाल तापमानातील वाढीमुळे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असून, दुपारची वेळ मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह कोकणासाठीसुद्धा भट्टीइतकी उष्णता देऊन जात आहे. 

पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान? 

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार राजस्थानसह गुजरात प्रदेशात निर्माण झालेल्या अँटीसायक्लोनचा परिणाम म्हणून सध्या उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेनं वाहत आहेत. परिणामी पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे कोकणात तापमान अधिक आहे. 

 

तिथं ठाणे, पालघर भागातही मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला आहे. पारा 41 अंशांवर पोहोचला होता. गेल्या दहा दिवसांत शहरातील तापमानात मोठी वाढ होऊन तापमान ही वाढ 10 अंशांची असल्यानं पुढील 24 तासांमध्ये अर्थात 10 मार्च रोजी अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

मुंबई- 39.0
अकोला- 40.0
सांगली- 38.2
पुणे- 37.7
सोलापूर- 39.4
कोल्हापूर- 37.1

उष्ण दिवस वाढणार 

यंदाच्या वर्षी मार्च ते मे महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील आणि उष्ण दिवसांची संख्या वाढेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या दरम्यान उष्माघाताचा धोका अधिक बळावताना दिसत आहे. ज्यामुळं उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असल्याचा इसारा देण्यात येत आहे. याशिवाय हलके, सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिला जात असून, घराबाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचे सेवन करावे असा सल्ला आरोग्य यंत्रणांनी दिला आहे. 

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp