Vijay Wadettiwar apology in Congress Meeting: चंद्रपुरात काँग्रेसकडे आपला महापौर बसवण्याची संधी असतानाही दोन गट निर्माण झाल्याने हातची सत्ता गमावली. दुसरीकडे भाजपाने संधी साधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करत आपला महापौर बसवला आहे. दिल्ली दरबारी जाऊनही विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद मिटला नाही. धानोरकर -वडेट्टीवार गटातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वरिष्ठांनी आज दिल्लीत झालेल्या बैठकीत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विजय वडेट्टीवारांनी मागितली माफी

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्रपूर महानगर पालिकेत झालेल्या पराभवाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफीही मागितली आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांची त्यांनी माफी मागितली. मला माफ करा (I am Sorry) म्हणत विजय वडेट्टीवार खेद व्यक्त केला. यावर वरिष्ठांनी हे योग्य झालं नाही आणि ही योग्य वेळ नाही (THIS IS NOT DONE AND THIS IS NOT RIGHT TIME) असं म्हटल्याचं समजत आहे. 

महापौर निवडणुकीवरुन चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु झाली होती. एकमेकांचे नगरसेवक पळविणे त्यांचे जवळजवळ अपहरण करणे इथपर्यंत प्रकार झाले. काँग्रेसच्या अंतर्गत वर्चस्वाचा वाद जिल्हा, विभाग ,प्रदेश आणि थेट दिल्लीत पोहोचला. त्यात समेट झाल्यानंतर काँग्रेसच्या 27 नगरसेवकांचा एक गट अगदी 2 दिवस आधी नोंदला गेला. धानोरकर गटाला महापौरपद तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला असा फॉर्म्युला निश्चित झाला होता. सहकारी पक्षांना स्थायी समिती देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र सर्व खेळ उबाठा शिवसेना- वंचित आणि अपक्ष यांच्या दहा जणांच्या गटावर अवलंबून होता. 

महाराष्ट्रासंदर्भात पार पडली वेगळी बैठक

 
महाराष्ट्राच्या संदर्भात राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत वेगळी बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  विजय वड्डेटीवार आणि खासदार रजनी पाटील उपस्थित होत्या. चंद्रपूर महापालिका सत्ता स्थापनेत झालेला गोंधळ, राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आलेल्या अपयशासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं समजत आहे. 

हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा फेटाळला

चंद्रपूरमध्ये सगळे नगरसेवक एकसंघ राहिले, आमच्यात फूट पडली नाही. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने थेट भाजपला मतदान केले. त्यांनी ते मतदान केले नसते तर आमचा महापौर बसला असता असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. 

तसंच बैठकीत चंद्रपूरसंदर्भात चर्चा झाली नाही असा दावा केला आहे. परभणीत उलट परिस्थिती असताना आमच्या नगरसेवकांना विविध पक्षांकडून प्रस्ताव होता. आम्ही त्यांना सोबत घेतले असते तर आमचा महापौर झाला असता. आम्ही परभणीत जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांनी चंद्रपूर येथे घ्यायला हवी होती असं ते म्हणाले आहेत. 

बहुमत नसल्याने रस्सीखेच

34 हा बहुमताचा आकडा कुणालाही मिळालेला नव्हता. त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र शिवसेनेने पहिला महापौर आपलाच हवा अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यावरून गेले सुमारे 20 दिवस चर्चा -संवाद यावर सस्पेन्स जारी होता. 

भाजपच्या गोटात या मनपा निवडणुकीत 2 तंबू बघायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी प्रत्येक जागा, प्रत्येक पद याबाबत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांना महसूलमंत्री बावनकुळे यांना चंद्रपुरात पाठवून तात्पुरता समेट घडवावा लागला.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp