Eknath Shinde Operation Tiger in Delhi: एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. दिल्लीत शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभेतील खासदारसंख्या वाढवण्यासाठी हे मिशन आखण्यात आलं आहे. दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीत यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचंही समजत आहे.
‘ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात’
लोकसभा खासदार संख्या वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निम्म्याहून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सकारात्मक असल्याचीही माहिती आहे.
पंतप्रधान मोदींशी चर्चा
नुकत्याच केलेल्या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट घेतली असून, ठाकरेंच्या संपर्कात असलेल्या खासदारांची माहिती दिली आहे. या खासदारांना शिंदे प्रवेश देण्यासंदर्भात सर्व कायदेशीर अडथळे व तरतुदी याबाबत चर्चा केल्याचं समजत आहे. योग्य वेळ ठरवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ते निर्वस्त्र होऊन आपल्या राज्यात गेले – संजय राऊत
दरम्यान खासदार संजय राऊतांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य करताना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “इथे जर कोणी ऑपरेशन टायगर करायला आलं असेल तर दिल्लीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. पानीपत आणि मुघल काळापासूनचा फार मोठा इतिहास आहे. जे लोक अशा प्रकारचे ऑपरेशन करायला आले, ते निर्वस्त्र होऊन आपल्या राज्यात गेले. या दिल्लीतून प्रत्येकाला जावंच लागतं. ही दिल्ली कोणाची नाही. ऑपरेशन करणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे”.
मुळात त्यांच्यात गटात एका वेगळ्या गटाकडून ऑपरेशनचं काम सुरु आहे. त्याही ऑपरेशनची सूत्रं दिल्लीतून हालत आहेत. त्यामुळे दिल्लीत आले असतील. मी कोणाचंही नाव घेणार नाही. नाव घेणं, चिखलफेक करणं, आरोप करणं योग्य नाही. काहीतरी खदखद असून त्याचा स्फोट होऊ शकतो.. ते काहतरी करायला जात आहेत ते त्यांच्यावर उलटू शकतं असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे.
“आमचे 9 खासदार 4 दिवसांपूर्वीच येथे बैठकीसाठी आले होते. प्रत्येकाच्या मतदारंसघात अडचणी आहेत. विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांना निधी दिला जात नाही. त्यांची कोंडी केली जात आहे. केंद्राच्या, राज्याच्या मुख्यमत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत की, विरोधी पक्षांच्या आमदारांच्या खासदारांच्या कामाची दखल घ्यायची नाही. जणू यांच्या बापाचै पैसे आहेत. धुणी भांडी करुन यांच्या बापजादाने पैसा गोळा केला आहे. हाजनतेचा पैसा आहे. विरोधी पक्षाचे आमदार, खासदार निवडून आले त्यांनाही विकास कऱणं गरजेचं आहे,” असंही त्यांनी म्हटलं.