Sunil Tatkare on Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर एकमताने सर्वांनी हात उचलून पाठिंबा दिला. तसंच सुनील तटकरे यांची पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने सुनेत्रा पवारांसह सर्व नेत्यांनी भाषणात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनील तटकरेंनी यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं.
‘…मग आम्ही एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला’
“2014 साली भाजपाला पाठिंबा द्या हे शरद पवार यांनीच सांगितलं. 2023 साली दादा एकटे होते त्यावेळेस आम्ही दादांना साथ दिली. अजितदादा आम्हाला म्हणाले होते मी एक निर्णय घेणार आहे तुम्ही मला साथ देणार का? तेव्हा आम्ही सगळे नेते दादा यांच्या पाठीमागे उभे होतो. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ असे अनेक नेते दादांसोबत उभे राहिले, कारण महाराष्ट्र घडवण्याची ताकद त्यांच्यात होती. दादांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मान्य केलं आणि मग 3 जुलै रोजी एनडीएमध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला,” असं सुनील तटकरेंनी यावेळी सांगितलं.
‘दादांनी हे पराभव स्वीकारून मला फोन केले’
“एनडीमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी आणि राज्यासाठी किती महत्वाचा आहे हे दादांनी स्पष्ट केले होते. आपल्याला लोकसभेत पराभव स्विकारावा लागला. मात्र दादांनी हे पराभव स्वीकारून मला फोन केले आणि सांगितल तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलांना एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला जायचे आहे. मी दिल्लीला जाण्यापूर्वी माझ्या सर्वस्वी असलेल्या अजितदादा यांना भेटलो आणि नंतर दिल्लीला निघालो,” अशी माहिती त्यांनी दिली.
‘दूधवाला आणि पेपरवाला लोकांच्या सेवेसाठी’
“त्या काळात दादांना हिणवलं गेलं की दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला देखील सकाळी उठतो. तेव्हा टीका करणाऱ्यांना मी सांगितल दूधवाला आणि पेपरवाला लोकांच्या सेवेसाठी लवकर उठतात. आता टीका कोणी केली हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे,” असं त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता म्हटलं.
नियतीने आपल्यावर दुर्दैवी वेळ आणली आणि त्यातून आज आपण वहिनीची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करत आहोत असं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आता बोलण्याचे थांबा अथवा अनेक गोष्टी सांगता येईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
‘हेच सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवणार’
बारामतीमध्ये दादांनी एक भाषण केले होते, त्यात ते म्हणाले होते मला जरी एकटं पाडलं गेलं असेल तरी मी आज एकटा नाही. त्यावेळी दादांवर ही परिस्थिती आणली गेली मात्र आपण सगळे दादांसोबत उभे राहिलो. ट्रोल करणाऱ्यांनी पैसे देऊन आम्हाला ट्रोल करावे मात्र आमची निष्ठा साफ आहे. मी आज महाराष्ट्राला सांगतोय, होय आज पासून राज्यात सुनेत्रा पर्व सुरू झाले आहे. हेच सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवणार आहे असं सांगत तटकरेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर हल्लाबोल केला.