Parth Pawar on Sunil Tatkare and Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचे पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. यानंतर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूल आयोगाला पत्र पाठवून आधीची पत्रं ग्राह्य धरु नका असं सांगितलं. दरम्यान हे पत्र समोर आलं असून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नसल्याने त्यांच्याकडून पद काढून घेतलंय का? अशी विचारणाही होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवार दिल्लीत 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत आहेत. सुनेत्रा पवार बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्या. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय आहे. याअगोदर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेते होते उपस्थित होते. 

 

अजित पवार यांच्या प्रत्येक दिल्ली दौऱ्यादरम्यान तटकरे आणि प्रफुल पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळत होती. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे. यासंदर्भात तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता आपण मतदार संघात असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच आपण दिल्लीत असतो तर भेटलो असतो असं सांगितलं आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.

पार्थ पवारांची पोस्ट

या सर्व घडामोडी आणि चर्चांदरम्यान पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या सर्व रिपोर्ट निराधार आणि काल्पनिक असल्याचं म्हटलं आहे, तसंच ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख केला आहे. 

“प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार रिपोर्ट आणि केवळ तर्कवितर्कांवर आधारित गोष्टी म्हणजे निव्वळ काल्पनिक आहेत. त्यांची अनेक दशकांची अढळ निष्ठा आणि नेतृत्व आम्हा सर्वांना आजही मार्गदर्शित करत आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी असून, या गोष्टीचा तीव्र शब्दांत निषेध व्हायलाच हवा,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काय?

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रव्यवहार केल्यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी पाठवलेले पत्र ग्राह्य धरू नका म्हणून सांगितलं होतं. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचे पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिकार द्यावेत अशा आशयाचे पत्र देण्यात आले होते. 

या घडामोडीनंतर पक्षात बरेच वादंग झाले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार समाधानी नसल्याची माहिती आहे. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp