Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानाशास्त्र विभागाच्या माहितीनुसार अर्थात आयएमडीनं पुढील 24 ते 48 तासांसाठी जारी केलेल्या इशाऱ्यानुसार देश स्तरावर पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल इथं सोसाट्याचे वारे वाहतील. शेतकऱ्यांना यामुळं काही नुकसाचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यानच्या काळात देशात हिमालय क्षेत्रामध्ये एक पश्चिमी झंझावात नव्यानं प्रवेश करणार आहे. त्यामुळं ज्यामुळं देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय भागावर पुन्हा बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या मध्य भागात पुढील 24 तासांमध्ये ताशी 30 ते 35 किमी वेगानं वारे वाहणार असल्यामुळं नजीकच्या राज्यांमध्ये उकाडा तुलनेनं कमी जाणवेल.
महाराष्ट्रात सूर्य आग ओकणार…
फेब्रुवारीपासूनच राज्यात तापमानाचा आकडा वाढला असून, त्यामुळं यंदाचा उकाडा मोठ्या मुक्कामाला आलाय हेच स्पष्ट झालं. उन्हाळ्याच्या धर्तीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा 37 अंशांपलिकडे पोहोचला आहे. तर, सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर इथं करण्यात आली आहे. राज्यात तूर्तास या उकाड्यापासून दिलासा मिळणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला असून, विदर्भामध्ये उष्मा अधिक जाणवत असून, तापमान 36 अंशांच्या घरात असलं तरीही त्याचा दाह मात्र चाळीशीपार असणाऱ्या तापमानाइतका जाणवू लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही स्थिती वेगळी नसून इथं सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि मराठवाडा क्षेत्रातही सूर्य आक ओकत असल्याचं जाणवणार आहे. किनारपट्टी क्षेत्रांमध्ये दमट वातावरणात वाढ होणार असून, मुंबईची होरपळही इतक्यात कमी होणार नसल्याचा गंभीर इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
अचानकच का दाटून येतात ढग?
उकाडा वाढत असतानाच काही प्रसंगी सूर्य झाकोळल्याचंही पाहायला मिळत आहे. इथं बाष्पीभवनाची प्रक्रिया कारणीभूत असल्याचा प्रथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम असेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळं हा उकाडा इतक्यात पाठ सोडणार नाही हेच खरं!