Maharashtra SSC and HSC Result: दहावी-बारावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. त्यामुळं 15 मेपर्यंत दहावी-बारावीचा निकाल लागू शकतो.
दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष लागून राहिले आहे. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दर वर्षीपेक्षा यंदा दहा दिवस लवकर सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळं साधारणपणे एसएससी बोर्डाचा बारावीचा निकाल हा पुढच्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कधीही लागू शकतो. इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेचे दोन्ही निकाल 15 मे च्या आतच लागणार, अशी माहिती एसएससी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2025मध्ये आयोजित केल्या होत्या. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2025 या कालावधीत झाली होती. तर, दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत पार पडली होती. त्यामुळं यंदा लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये.
निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून एक पत्रकार परिषददेखील घेण्यात येऊ शकते. तेव्हा निकालाची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट्स mahresult.nic.in, mahahsscboard.in, आणि hscresult.mkcl.org वर आपला निकाल पाहू शकतात.
आयसीएसई बोर्डामध्ये दहावीच्या परीक्षेत राज्याचा ९९.९० टक्के
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्या आयसीएसई (दहावी) परीक्षेत राज्यातील ९९.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर आयएससी मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत ९९.८१ टक्के विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधील इशमीत कौर आणि आरव बर्धन यांनी बारावीत शंभर टक्के गुण मिळवले.