Hanuman Niti In Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक केलं जातंय. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावर भाष्य केलंय. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांविरुद्ध भारताचे योग्य प्रत्युत्तर असल्याचे वर्णन त्यांनी केलंय. ऑपरेशन सिंदूरवेळी आपण हनुमान नितीचा अवलंब केल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. काय आहे हनुमान निती? जाणून घेऊया. 

ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले, आम्ही त्यांना मारले’, हा भारताचा प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.हा हल्ला फक्त दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित होता. भारतीय सैन्याने अचूकता, दक्षता आणि मानवता दाखवली. यासाठी मी संपूर्ण सैन्याचे आणि पंतप्रधान मोदींचेही अभिनंदन करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना हनुमान नितीशी केली. हनुमानजींनी अशोक वाटिका येथे केलेल्या मोहिमेशी याचा संबंध जोडला. ज्याप्रमाणे हनुमानजींनी फक्त राक्षसी संरचना नष्ट केली, त्याचप्रमाणे भारताने दहशतवादाची रचना नष्ट केल्याचे ते म्हणाले. ते सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

‘आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केले आहे जे त्यांनी अशोक वाटिका नष्ट करताना पाळले होते. ‘जिन्ह मोही मारा तिन मोही मारे’ म्हणजेच आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या निष्पापांना मारले. पूर्वीप्रमाणेच यावेळीही आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे अड्डे उद्ध्वस्त करून योग्य प्रत्युत्तर दिले असल्याचे ते म्हणाले.

कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींकडून सैन्याचे कौतुक

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय सैन्याचे कौतुक केले. बैठकीच्या सुरुवातीला कॅबिनेट मंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. भारतीय सैन्याने तयारीनुसार आणि कोणतीही चूक न करता ही कारवाई केली. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सैन्याचे कौतुक केले आणि हा एक अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले.

पंतप्रधान मोदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रात्रभर ‘ऑपरेशन सिंदूर’वर लक्ष ठेवून होते. ऑपरेशन योजनेनुसार पुढे जावे यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी कमांडर्सशी सतत संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, हवाई दलाचे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी सहभागी झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरील हल्ल्यांचे क्लिपही दाखवले.

ऑपरेशन सिंदूरची माहिती

या ऑपरेशनबद्दल कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली. त्या म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले. याअंतर्गत 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण होतेय. ज्या पाकिस्तान आणि पीओके दोन्हीमध्ये पसरलेल्या आहेत. पीओजेकेमधील पहिले लक्ष्य मुझफ्फराबादमधील सवाई नाला कॅम्प होते. जे नियंत्रण रेषेपासून 30 किमी अंतरावर आहे. हे लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते.’

हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, ‘हा हल्ला पहाटे 1.05 ते 1.30 च्या दरम्यान करण्यात आला.’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी आणि कोणत्याही नागरिकांच्या जीवितहानी टाळण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती.’





Source link

YouTube
Instagram
WhatsApp