Pune News: पुण्यातील हिंजवडीच्या IT हबमधील एका अंगणवाडीत घडलेल्या प्रकाराने पालक आणि स्थानिक नागरिक चांगलेच हादरले. शिकवायचं, खेळवायचं आणि सांभाळायचं अंगणवाडी केंद्र मात्र काही काळासाठी ‘बंदिस्त खोली’ बनलं. अंगणवाडीतील 20 चिमुकल्यांना आत कुलूप लावून सेविका आणि मदतनीस बैठक अटेंड करण्यासाठी निघून गेल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांचा संताप आणि चिंता दोन्ही तीव्रतेने उफाळून आले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

नक्की कुठे घडला हा प्रकार?

हा प्रकार हिंजवडीमधील अंगणवाडी नंबर 3 मध्ये घडला. दुपारी 11 ते 12 या तासाभराच्या कालावधीत मुलं आत बंद होती आणि व्हिडीओमध्ये त्यांचा रडण्याचा आवाज, घाबरलेले चेहरे आणि एकटेपणाचा आक्रोश स्पष्ट जाणवतो. IT हबसारख्या गजबजलेल्या भागात मुलांना अशा अवस्थेत टाकून जाणं ही बेदरकार कृती असली तरी, तिचे परिणाम मात्र गावाच्या चौकापासून ते सोशल मीडियाच्या स्क्रीनपर्यंत सर्वत्र पोहोचले.

बैठक महत्त्वाची की मुलांचे जीव?

सविता शिंदे (सेविका) आणि शिल्पा साखरे (मदतनीस) यांनी ग्रामपंचायतीतील एका बैठकीसाठी बोलावलं गेल्याचा दाखला दिला. आम्हाला ‘यात मान होता, उपस्थिती महत्त्वाची होती,’ असं सांगत त्यांनी स्पष्टीकरण दिलं, मात्र मुलांना आत ठेवून कुलूप लावून जाणं ही ‘क्षुल्लक गोष्ट’ नव्हती, हे आता जगजाहीर झालं आहे. बैठकीला बोलावणारे ग्रामपंचायतीत एका माजी सरपंच असल्याचे कारण समोर आले, पण ‘मुलांना सांभाळण्याची जबाबदारी’ बैठक बोलावणाऱ्यांपेक्षा मोठी असते, हेच त्या विसरल्या.  

 

अधिकाऱ्यांचे तातडीचे पाऊल, पण… 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुळशी पंचायत समितीला कळवलं. बालविकास विभागाचे अधिकारी धनराज गिराम यांनी कोणताही विलंब न करता, सेविका आणि मदतनीसांना बैठक सोडून तात्काळ कुलूप उघडण्याचे आदेश दिले. मात्र, या घटनेनंतर जबाबदारांवर काय कारवाई होणार, पालकांच्या तक्रारीचं पुढे काय रूप घेणार आणि बाल विकास विभाग याला ‘अधिकृत दखल’ कशी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.





Source link