Uday Samant Big Claim: महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भात त्यांनी मोठा दावा केला आहे. जर हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
उदय सामंत यांचा दावा काय?
नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. यादरम्यान एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आरोप-प्रत्युत्तर, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याच उदय सामंत यांनी एक दावा केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसातच सगळं काही समोर येईल असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे.
संजय शिरसाट यांनीही केला होता दावा
उदय सामंत यांच्याआधी शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनीही असाच एक दावा केला होता. उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांना माध्यमांशी केला होता. आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केलं होतं.
“उद्धव ठाकरेंचे 20 पैकी 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मी रोज त्यांच्या संपर्कात आहे, माझं रोज त्यांच्याशी बोलणं होतं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे झेंडा दाखवतील, ते सगळे आमच्या शिवसेनेत दाखल होतील,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं.
सगळ्या आमदारांची नावं माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर त्यांची नावं जाहीरपणे सांगणार असंही त्यांनी म्हटलं होतं. हे सर्व आमदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले असून, लवकरच आमच्या शिवसेनेत येणार आहेत असा दावा त्यांनी केला होता.