Maharashtra Politics Crrupt Money: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्तेतील तिन्ही पक्षांकडे हरामाचा पैसा असल्याचा टोला लगावला आहे. ‘सामना’मधील ‘रोखठोक’ या सदरामधून राऊत यांनी हा टोला लगावला आहे. “महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे पुरते वस्त्रहरण केले. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या व लुटमारीच्या फाईल्स आपल्याकडे आहेत हा बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवली,” असं राऊत म्हणालेत.
1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी
“भाजपने त्यांचे सरकार (1999) असताना 100 कोटींचा सिंचन घोटाळा केला व हे 100 कोटी ‘पार्टी फंड’ म्हणून वळवले. या व्यवहारात 10 कोटी लाच म्हणून अधिकाऱ्यांना दिले. पुरंदर जलसिंचन योजनेत हा घोटाळा झाला. योजनेची किंमत 330 कोटींपर्यंत वाढवली. ही वाढवलेली किंमत होती. 100 कोटी रुपये वाढवून फाईल तयार केली. 1999 मध्ये 100 कोटी म्हणजे आजचे दोनेक हजार कोटी. भाजपने सिंचन घोटाळा करून हे पैसे घेतले व अजित पवार यांनी भाजपचा सिंचन घोटाळा उघड केला. ही फाईल आपल्या ताब्यात असल्याचा स्फोट अजित पवार यांनी आता केला. गणेश नाईक यांच्या शब्दांत सांगायचे तर हा हरामाचा पैसा आहे,” असं राऊत म्हणालेत.
पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला
“अजित पवार, भाजप आणि शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हरामाचा पैसा आहे. हरामाच्या पैशांवर हे तिघे एकमेकांवर हल्ले करीत आहेत. तरीही तिघे एकाच सरकारमध्ये नांदत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला व मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. “भाजपने माझ्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्या सरकारमध्ये आहे!” असे सांगून अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचा व मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुखवटा फाडला. शिंदे यांचा 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार आपण कसा रोखला, हे मुख्यमंत्री फडणवीस खुलेपणाने सांगतात,” असा टोमणा राऊतांनी लगावला आहे.
खरे राजकारण पुढेच घडणार
“भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेला निवडणूक आयोग म्हणून ही महानगरपालिका निवडणूक लक्षात राहील. त्या चिखलात त्यांनी मुंबईलाही बुडवले. हरामाच्या पैशांचा खळखळाट असा घडला की, सगळ्यांचीच वस्त्रं वाहून गेली. मराठी माणूस, मुंबईच्या रक्षणासाठी ‘ठाकरे बंधूं’नी झुंज दिली. हा अस्मितेच्या लढय़ाचा इतिहास नव्याने लिहिला जाईल. महापालिका निवडणुका संपल्या, निकाल लागले. खरे राजकारण पुढेच घडणार आहे,” असं सूचक विधान राऊतांनी केलं आहे.