Asha Bhosle Death : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. अति थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यानं काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांच्या त्या लहान बहीण होत्या. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.  राज ठाकरेंनी त्यांच्या एका भाषणात आशा भोसले यांच्याबद्दलचा उल्लेख केला होता. जुना व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे. 

   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Mns Chief Raj Thackeray) यांच्या पुढाकाराने मनसेतर्फे आयोजीत केलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमातील हा किस्सा आहे.  मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पुस्तक प्रदर्शनासोबतच कवितांची मैफीलही रंगली. या कार्यक्रमासाठी जावेद अख्तर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी भारतीय गायनविश्वातील प्रख्यात गायिका म्हणजे आशा भोसले यांनीही कविता वाचन केलं. तसेच आजारी होते, पण दोस्त राज ठाकरेंसाठी कार्यक्रमात आले, असंही त्यांनी म्हटलं.  मला घरी 15 मोठे पापलेट पाठवले. राज ठाकरे माझा दोस्त आहे. दोस्ताला कसं नाही म्हणणार असं आशाईतांईनी सांगितले.    

राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट

‘आशाताई’ -दि लास्ट एम्परर 
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. 
लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं. 
तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं.  तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं. 
‘गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा ‘ऍक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.  
असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली. 
मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत. 
‘पिया तू अब तो आजा’ मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. ‘आईये मेहरबान’ मध्ये लडिवाळपणा आहे, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ मध्ये नजाकत आहे. ‘दम मारो दम’ मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात. 
व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. 
जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील. 
मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं  ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी  आपल्याला घालून दिला ! 
जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या  रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या  रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला ! 
आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली. 
राज ठाकरे।





Source link

YouTube
Instagram
WhatsApp