<p>वंचित बहुजन आघाडीने अकोला शहरात ‘नया साल, नया खासदार’ म्हणत प्रकाश आंबेडकरांचे बॅनर्स लावण्यात आलेत… संजय धोत्रे आजारी असल्याने भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नसताना आंबेडकरांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केल्याची चर्चा होतेये. आंबेडकरांनी सहा महिन्यापूर्वीच अकोल्यातून लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘इंडिया आघाडी’ आणि ‘मविआ’ सहभागाचा तिढा सुटलेला नसतांना आंबेडकरांच्या वंचितनं अकोल्यात प्रचाराला सुरूवात केलीये. अकोला शहरातील मुख्य चौकांमध्ये आंबेडकरांचे बॅनर्स लागलेय. अकोल्यातील बॅनर लागलेल्या अशोक वाटिका चौकातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी… </p>
Bacchu Kadu on Amravati Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुका काही महिन्यावर (Lok Sabha 2024) येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्षाने तशी तयारीही सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) अमरावती मतदारसंघावर दावा ठोकलाय. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी अमरावती मतदारसंघावर आमचाच दावा असल्याचे म्हटलेय. आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही, असेही त्यांनी सांगितलेय. त्याशिवाय अमरावतीची जागा (Amravati Lok Sabha constituency) प्रहारला मिळाली पाहिजे, नाहीतर नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, असेही म्हटलेय.
मी कुणाच्या बाजूने हे कोडं –
आम्ही सध्या कोणाच्याही (महायुती, महाविकास आघाडी) बाजूने नाही. काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आपली राजकीय भूमिका निश्चित करणार आहोत. मी कुणाच्या बाजूने हे कोडं आहे आणि ते व्यवस्थितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिकडे आम्ही जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले. हो मी राजकीय मोलभाव ( बार्गेनिंग ) करतो आहे आणि ते आम्ही व्यवस्थित करू. लोकसभाऐवजी आम्हाला विधानसभेत जास्त जागा हव्या आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.
अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा, नवनीत राणांनाही ऑफर –
बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून मी त्यांना ही ऑफर देत आहे.
महायुतीत बिघाडी? बच्चू कडूंना पत्रकार परिषदेचं आमंत्रण नाही-
महायुतीच्या आजच्या एकत्रित प्रेस कॉनस्पेन्स संदर्भात मला माहिती नाही. आजच्या महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल मला निरोप नाही, निमंत्रणही नाही म्हणून मी तिथे उपस्थित नाही, असे बच्चू कडू म्हणाले. कदाचित महायुतीतील पक्षांना मला विश्वासात घ्यावं असं वाटलं नसावं. मला का बोलावलं नाही हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहीत असेल. ते त्यांना विचारलं पाहिजे. मला बोलावलं नाही गोष्टीत मी लक्ष घालत नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितलं.
भाजप राजकीय श्रेय घेणारच, बच्चू कडूंची टीका –
राम मंदिराचं बांधकाम अर्धवट आहे, त्यात देवाची स्थापना करणे योग्य नाही, याबद्दल संजय राऊत यांची काय धार्मिक माहिती आहे मला माहित नाही. मात्र भाजप राजकीय श्रेय घेणारच. भाजपनं त्या संदर्भात पुढाकार घेतलाय, त्यानंतर प्रभू रामचंद्र यांचं मंदिर उभं राहिलं म्हणून ते श्रेय घेणारच.इतर पक्षांनी केलं असतं तर त्यांनी पण श्रेय घेतलं असतं. मात्र हे काही एकट्या भाजपचं श्रेय नाही, अनेक रामभक्तांनी बलिदान दिले आहे, विविध संघटनांनी प्रयत्न केले आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.
राम मंदिराच्या निमंत्रणावरुन काय म्हणाले बच्चू कडू?
मी राम भक्त आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणाची मला गरज नाही. राम भक्तांना निमंत्रनाची आवश्यकता वाटावी हे रामभक्तांचा अपमान आहे. उद्धव ठाकरे यांना राम मंदिरासाठी निमंत्रण शिवाय जाऊ नये असं वाटतंय, हा त्यांचा प्रश्न आहे, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेय.
<p>Petrol Pump Amravati : अमरावतीमध्ये पेट्रोलपंपावर पहाटेपासून वाहनांच्या रांगा हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. </p>
अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले. सहा महिन्यांपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवार महायुतीत (Mahayuti) गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. एवढंच नाही तर त्यांचे बॅनर देखील लागले होते. अशा चर्चांना उधाण असताना आता राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) रांगोळीच्या माध्यमातून 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना बनविण्याचा संकल्प केला आहे.
‘मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…
अकोल्यातील एका कलाकाराने अजित पवार यांचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले असून त्याखाली ‘मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…लवकरच…2024…’ असा सूचक संदेश लिहाण्यात आला आहे. या रांगोळीचा व्हिडीओ अमोल मिटकरींनी शेअर करत त्याखाली कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही सर्वसामान्यांची भावना आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरवू. या संकल्पासह ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ आणि ‘अजितपर्व’ असा हॅशटॅगही मिटकरी यांनी वापरला आहे. अजित पवार यांना 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवणे हा संकल्प या रांगोळीद्वारे जाहीर करण्यात आला आहे.
रांगोळीतून व्यक्त केल्या भावना
हेमंत उकरीकर या कलाकाराच्या कलेतून साकारलेली ही अजित दादांची कलाकृती निश्चितच प्रत्येक महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातील भावना आहे. अजित दादा महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी जे विधायक निर्णय घेतले, हा भावी वाटचालीसाठीचा चांगला संकेत आहे. आज संपूर्ण जग आणि देश नवीन वर्षांचे स्वागत करत आहे. माझा परिवार सुद्धा या नवीन वर्षांचे स्वागत करताना ईश्वरा चरणी प्रार्थना करतो आहे की, या रांगोळी कलाकाराने रांगोळीत साकारलेल्या ओळी, ‘मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…’ हा संकल्प 2024 मध्ये पूर्ण होवो. महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा आणि महाराष्ट्राचे नेतृत्व अजित दादाच्या माध्यमातून व्हावे. तसेच पांडुरंगाची आषाढीची महत्वाची अशी मानाची महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार करतील. अशी आमची प्रार्थना ईश्वराकडे आहे. निश्चितच त्यासाठी फार मेहनत आम्हाला घ्यावी लागणार आहे. उद्यापासून प्रत्येक नवा दिवस हा संघर्ष आणि प्रचंड मेहनतीचा असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यासाठी तत्पर आहे. आमच्या परिवारातर्फे अजित दादांना 2024 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी आम्ही ही रांगोळी साकारली असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच अमरावती (Amravati) जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मोठा दावा केला आहे. “राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) झाल्यावर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील. त्यामुळे भाजपच्या (BJP) विरोधात एकच पक्ष राज्यात उरणार असल्याचा दावा,” रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना रवी राणा म्हणाले की, “ज्या पद्धतीने संपूर्ण देश, ज्या भावनेने राम मंदिर कधी बनणार, पत्र्याच्या शेडमध्ये असलेले राम लल्ला भव्य राम मंदिरात कधी विराजमान होणार याची आतुरता होती. अनेक विरोधी पक्षांनी राजकारण केलं. ‘राम मंदिर हम बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे’ असे होते. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बनवलं सुद्धा आणि तारीख देखील सांगितली. 22 तारखेला देशाचं आस्थेचं स्थान, श्रद्धा स्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची परिस्थिती बदलणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जे तीन पक्ष आहेत, त्यातील दोन पक्ष राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोदींच्या सोबत असल्याचे पाहायला मिळतील,” असे राणा म्हणाले.
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राजकीय बदल
पुढे बोलतांना रवी राणा म्हणाले की,”देशातील अनेक जे पक्ष एकत्र झाले आहेत. ते सर्वजण संभ्रमात आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या सर्व पक्षांचा संभ्रम दूर होणार आहे. त्यानंतर देशातील अनेक पक्ष मोदी यांना पाठिंबा देतील. महाराष्ट्रातील देखील महाविकास आघाडीमधील दोन पक्ष जेव्हा मोदींना जुळतील, तेव्हा महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात एकच पक्ष राहणार आहे. आणि हा पक्ष कोणता आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राजकीय बदल आपल्याला पाहायला मिळतील,” असेही राणा म्हणाले.
राणा दाम्पत्य नेहमीच चर्चेत…
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असल्याचे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे हे दोनही पती-पत्नी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे राणा दाम्पत्य विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं रवी राणा आणि नवनीत यांनी जाहीर केलं होतं. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
<p>अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार झालाय. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. सुदैवाने या गोळीबारात कुणीच जखमी झालेलं नाहीय. तसंच या गोळीबारावर पोलिसांनी मौन बाळगलंय. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केलीय. मात्र या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. </p>