Sunil Tatkare on Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर एकमताने सर्वांनी हात उचलून पाठिंबा दिला. तसंच सुनील तटकरे यांची पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने सुनेत्रा पवारांसह सर्व नेत्यांनी भाषणात अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनील तटकरेंनी यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं.
Add Zee News as a Preferred Source
‘…मग आम्ही एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला’
“2014 साली भाजपाला पाठिंबा द्या हे शरद पवार यांनीच सांगितलं. 2023 साली दादा एकटे होते त्यावेळेस आम्ही दादांना साथ दिली. अजितदादा आम्हाला म्हणाले होते मी एक निर्णय घेणार आहे तुम्ही मला साथ देणार का? तेव्हा आम्ही सगळे नेते दादा यांच्या पाठीमागे उभे होतो. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ असे अनेक नेते दादांसोबत उभे राहिले, कारण महाराष्ट्र घडवण्याची ताकद त्यांच्यात होती. दादांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मान्य केलं आणि मग 3 जुलै रोजी एनडीएमध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला,” असं सुनील तटकरेंनी यावेळी सांगितलं.
‘दादांनी हे पराभव स्वीकारून मला फोन केले’
“एनडीमध्ये जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी आणि राज्यासाठी किती महत्वाचा आहे हे दादांनी स्पष्ट केले होते. आपल्याला लोकसभेत पराभव स्विकारावा लागला. मात्र दादांनी हे पराभव स्वीकारून मला फोन केले आणि सांगितल तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलांना एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला जायचे आहे. मी दिल्लीला जाण्यापूर्वी माझ्या सर्वस्वी असलेल्या अजितदादा यांना भेटलो आणि नंतर दिल्लीला निघालो,” अशी माहिती त्यांनी दिली.
‘दूधवाला आणि पेपरवाला लोकांच्या सेवेसाठी’
“त्या काळात दादांना हिणवलं गेलं की दूधवाला पण सकाळी उठतो, पेपरवाला देखील सकाळी उठतो. तेव्हा टीका करणाऱ्यांना मी सांगितल दूधवाला आणि पेपरवाला लोकांच्या सेवेसाठी लवकर उठतात. आता टीका कोणी केली हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे,” असं त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता म्हटलं.
नियतीने आपल्यावर दुर्दैवी वेळ आणली आणि त्यातून आज आपण वहिनीची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करत आहोत असं त्यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आता बोलण्याचे थांबा अथवा अनेक गोष्टी सांगता येईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
‘हेच सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवणार’
बारामतीमध्ये दादांनी एक भाषण केले होते, त्यात ते म्हणाले होते मला जरी एकटं पाडलं गेलं असेल तरी मी आज एकटा नाही. त्यावेळी दादांवर ही परिस्थिती आणली गेली मात्र आपण सगळे दादांसोबत उभे राहिलो. ट्रोल करणाऱ्यांनी पैसे देऊन आम्हाला ट्रोल करावे मात्र आमची निष्ठा साफ आहे. मी आज महाराष्ट्राला सांगतोय, होय आज पासून राज्यात सुनेत्रा पर्व सुरू झाले आहे. हेच सुनेत्रा पर्व महाराष्ट्र घडवणार आहे असं सांगत तटकरेंनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर हल्लाबोल केला.
Rohit Pawar on Ajit pawar Baramati Plane Crash : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा घातपात असल्याची शंका व्यक्त, करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रकरण उचलून धरलं आणि एफआयआर दाखल करून घेण्यासाठी थेट बारामती गाठली. जिथं दोन तास पोलिसांची चर्चा केल्यानंतर एफआयआर दाखल का करून घेता येणार नाही, पोलिसांनी यावर कोणती भूमिका मांडली, याबाबत खंत व्यक्त करणारी भूमिका माध्यमांशी संवाद साधताना मांडली.
Add Zee News as a Preferred Source
काय म्हणाले रोहित पवार?
‘दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक अहवाल आला, 24 फेब्रुवारीचा हा अहवाल असून. बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 ला आम्ही पदाधिकारी, समर्थकांसह मरीन ड्राईव पोलीस स्टेशनला एफआईआर दाखल करायला गेलो होतो. पण काहींनी शंका उपस्थित करत, मी मुंबईला एफआयआर करू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. झिरो एफआयआर कॉन्सेप्टअंतर्गत ही एफआयआर दाख करता येऊ शकते. मुंबईत हे शक्य होतं पण ते स्वीकारलं नाही, म्हणून आज आम्ही बारामती पोलीस स्टेशन ला आलोय’, असं सांगत कायद्यातील कलम आणि कायद्यांचा दाखला देत रोहित पवार यांनी तक्रार करण्याचा आपला अधिकार असल्याचं स्पष्ट केलं.
डिजीसीए रिपोर्टनुसारच व्हीएसआर विमान कंपनीवर ठपका ठेवला गेलाय असं सांगत त्याच आधारे आम्ही एफआईआर दाखल करण्याचा आग्रह धरतोय असं ते म्हणाले. ‘दादा ज्या विमानानं बारामतीला गेले ते लेअर जेट प्रकारातलं होतं हे विमान नॉन कम्लायन्स होतं मग तरीही अजित दादांना खराब असलेलं विमान का दिलं? असा आमचा सवाल हे म्हणूनच आम्ही या गलथान कारभाराला जबाबदार असलेल्या व्हिएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे हाच मुद्दा त्यांनी सातत्यानं उपस्थित केला.
पाचही विमान ग्राऊंड, मग अजित पवारांना बिघाड झालेलं विमान दिलेलं?
24 तारखेच्या डीजीसीएच्या आदेशानुसार व्हीएसआरचे पाचही विमान ग्राऊंड करत त्यांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली. नॉन कम्लायन्स कंपनीनं मान्य केला मग, मी पोलिसांसमोर हा प्रश्न केला की , पाचही विमानं ग्राऊंड करतात तर, अजित पवारांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिसं गेलं की मुद्दाम? यासाठीचाच एफआयआर करण्यासाठी आलेलो. जो व्हीएसआर कंपनीच्या मालकांविरोधातील असेल. मात्र, अजित पवारांचं विमान चांगल्या स्थितीत आहे, या अहवालावर कोणी सह्या केल्या? त्यांना शोधा अशी मागणी करणारा दुसरा एफआयआर आम्ही करणार होतो. विमान कोणतं द्यावं, ते उडण्यास सक्षम आहे की नाही, दृश्यमानता आहे की नाही इथपासून इतर सर्व गोष्टींची जबाबदारी आहे Arrow नावाच्या कंपनीकडे. एका व्हॉट्सअप चॅटनुसार एका पवार नावाच्या इसमानं हवामान योग्य असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर दादांच्या पीएनं दादांना सांगितल्यानंतर ते कारमधून विमानात बसले. या कंपनीवर कारवाई करण्याची आमची मागणी असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
दादांच्या अपघाताचा फक्त Accident Report
‘कायदेशीर सल्ला घेऊन एफआयआर दाखल करायचा की नाही ते सांगू. अॅक्सिडेंट रिपोर्ट फाईल झाल्यामुळं एफआयआर दाखल करता येणार नाही असं पोलीस सांगत आहेत’ असं म्हणताना दादांच्या अपघाताचा फक्त Accident Report झाला आहे, मात्र यातील गुन्हेगारी दृष्टीकोनाचं काय? असा सवाल रोहित पवारांनी केला. आपला अधिकारच इथं नाकारला जात असल्याचा नाराजीचा तीव्र सूर त्यांनी आळवला. कबुतरं चोरीला गेल्याचा एफआयआर होतो आणि अपघाताचा एफआयआर का नाही, असं म्हणताना रोहित पवारांनी कातरत्या पण तितक्याच आक्रोशानं शासनावर ताशेरे ओढले. आम्ही मांडलेले मुद्दे चुकीचे असतील तर जेलमध्ये टाका… पण, कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का?’ असं म्हणत रोहित पवारांनी उपस्थित केले उद्विग्न प्रश्न.
आमचा हक्क का नाकारला जातोय?
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार सर्व नागरिकांना एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे मग तरीही आमचा हक्क का नाकारला जातोय असाच उद्विग्न प्रश्न त्यांनी पस्थित करत विमानासंदर्भातील माहिती ज्या Whats App चॅटमध्ये होते हे चॅट आहे आपण आधीच दाखवले असून, त्या ग्रुपमध्ये काही मोठे अधिकारी होते असं सांगत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं हा अपघात झाला आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशीही एफआयआर आम्ही करण्याची मागणी धरली असल्याचं रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. मात्र पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर मिळालेला नकार हा त्यांच्या संतापात भर टाकताना दिसला.
HSC Exam: सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. याच परीक्षेला एक नवमाता आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आली. काहीही झालं तरी परीक्षा चुकवायची नाही, अशी तिची जिद्द. तर दुसरीकडे आपली जन्मदात्री सोडून गेली.तिचं पार्थिव घरी असतानाही तिचंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारावीच्या पेपरला गेलेली शालिनी या दोन्ही मुलींना नव्या पिढीला नवा संदेश दिलाय.
Add Zee News as a Preferred Source
बाळाला पाळण्यात घालून त्याला जोजवणारी आई 12 वीच्या परीक्षेला आली होती. हे पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं. नांदेडमधल्या बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेणा-या शीतल चित्ते प्रसूतीनंतर अवघ्या चार दिवसात शरीराची साथ नसताना बारावीचे पेपर लिहितेय. केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही नवमाता बारावीची परीक्षा द्यायला परीक्षा केंद्रावर पोहोचली. काहीही झालं तरी शिक्षण थांबणार नाही, असा संदेश तिने असंख्य मुलींना दिलाय.
बाळाला जन्म दिल्यानंतर शारीरिक परिस्थिती पाहता, नवमातेनं किमान सात दिवस तरी घराबाहेर पडू नये, असं डॉक्टर सांगतात. पण शिक्षणाची तळमळ, प्रबळ जिद्द आणि परिस्थितीवर मात करण्याची ताकद असेल तर कोणतंही स्वप्न अपूर्ण राहत नाही, असा संदेश ती देतेय. यात तिच्या पती आणि सासरच्या कुटुंबीयांनी तिला भक्कम साथ दिली.
4 दिवसांच्या बाळाला घेऊन परीक्षा
18 वर्ष पूर्ण होताच आई वडिलांनी लवकर लग्न लावून दिलं.पण शिक्षणात खंड नको म्हणून 20 वर्षांच्या शीतलनं 12 वी करण्याचा निर्णय घेतला.. त्यात ती गरोदर राहिली. 6 फेब्रुवारीला शीतलची प्रसूती झाली. 10 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार होती. पण या अवस्थेतही परीक्षा देण्यावर शीतल ठाम राहिली. अवघ्या चार दिवसांच्या बाळाला सोबत घेऊन ती परीक्षा केंद्रावर आली. परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक आणि कर्मचा-यांनीही त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. तिच्यासाठी खास मातृस्नेह कक्ष निर्माण केला.
आईचा परीक्षेच्या दिवशी मृत्यू
दुसरी एक घटना गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या तुमखेडमधली आहे.गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या शालिनीच्या आईचा परीक्षेच्या दिवशी मृत्यू झाला. मायेचा आधार गेला. पण त्या कोलमडलेल्या परिस्थितही आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिनीनं परीक्षा दिली.त्यानंतर साश्रू नयनांनी आईला निरोप दिला. प्रसुतीनंतर चार दिवसांनी तान्हुल्याला घेऊन परीक्षा देणारी शीतल असो किंवा आईचं पार्थिव घरात असताना बारावीचा पेपर द्यायला गेलेली शालिनी असेल. या दोघीही खूप काही शिकवून जातायत. दोन्ही घटनांमध्ये आईचं प्रेम आणि शिक्षणाचा ध्सास दिसतोय.
Ajit Pawar Death Baramati Vidhan Sabha By Election: उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये निधन झालं. मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवारांचं विमान बारामती विमानतळावरील 11 नंबरच्या धावपट्टीपासून 500 मीटर अंतरावर कोसळलं. या अपघातामध्ये अजित पवारांसहीत दोन्ही वैमानिक, त्यांचा अंगरक्षक आणि फ्लाइट अटेंडंटचा होरपळून मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त झाली. या घटनेला महिना उलटत आला तरी अनेकांना अजित पवारांच्या निधनावर विश्वास बसत नाही अशी स्थिती आहे. एकीकडे अजित पवारांच्या निधनाच्या वृत्तातून सावरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार निश्चित केला आहे.
Add Zee News as a Preferred Source
1991 पासून अगदी मृत्यूपर्यंत बारामतीचे आमदार
अजित पवार हे बारामतीमधून सलग आठ वेळा आमदार राहिले होते. 1991 पासून ते 2024 पर्यंत बारामती हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ अजिंक्य ठेवत किल्ला लढवला. अजित पवारांनी अगदी विक्रमी मताधिक्याने बारामतीमधून विजय मिळवला. 1991 मध्ये आधी लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेलेल्या अजित पवारांनी सहा महिन्यांमध्येच खासदारकीचा राजीनामा देत पोटनिवडणुकीमधून पहिल्यांदा बारामतीचा आमदार होण्याचा मान मिळवला. त्यानंतर ते इथून सलग आठ वेळा निवडून आले. 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर त्यांचाच पुतण्या योगेंद्र पवार उभा होता. मात्र अजित पवारांनी पुतण्याचाही सहज पराभव केला. अजित पवारांनी बारामतीमधून 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019, 2024 साली विधानसभेची निवडणूक जिंकली. अजित पवार हे सर्वाधिक वेळा म्हणजेच सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
अजित पवारांच्या जागी कोण लढणार?
अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून या ठिकाणाहून कोण लढणार हे पक्षाने निश्चित केलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. असं असतानाच आता बारामतीमध्ये अजित पवारांच्या विधानसभेच्या जागेवरुनही सुनेत्रा पवारच उभ्या राहणार असल्याचं पक्षाने निश्चित केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बारामतीमधून सुनेत्रा पवारच पोटनिवडणूक लढवतील यावर एकमत झालं आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.
28 जुलै 2026 महत्त्वाची तारीख
रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल अॅक्ट, 1951 च्या कलम 151 अ नुसार, विधानसभा जागा रिक्त झाल्यापासून उरलेला कार्यकाळ एका वर्षांपेक्षा जास्त असेल तर 6 महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. अजित पवार यांचा मृत्यू 28 जानेवारी 2026 रोजी झाला, त्यामुळे जागा रिक्त होण्याची हीच तारीख ग्राह्य धरली जाणार. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 2029 पर्यंत असल्याने सहा महिन्यांचा नियम लागू होतो. त्यामुळेच बारामतीमधील पोटनिवडणूक प्रक्रिया 28 जुलै 2026 च्या आधी पूर्ण करावी लागणार आहे. जूनमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी निवडणूक पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल अशी चर्चा आहे. त्यामुळेच एप्रिल-मे 2026 मध्ये निवडणूक होण्याची जास्त शक्यता आहे.
Samrudhi Highway Hawkers : मुंबई नागपूर समृद्धी हायवेवरील जालन्यातील कडवंची गावच्या भागात समृद्धी हायवेवर फेरीवाल्यांना पूर्णतः बंदी असताना तिथं राजरोसपणं फळविक्री सुरु झालीये.
Police Bharti: पोलीस म्हणजे कायद्याचे रक्षक असतात. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस निभावत असतात. पण पोलीस होण्यासाठीच कोणी गैरमार्गाचा वापर करत असेल तर? मिरा-भाईंदरमध्ये येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
काय घडलं नेमकं?
मैदानी चाचणीच्या अगोदर उत्तेजक द्रव्य (स्टेरॉइड) इंजेक्शन घेणारा एक उमेदवार पोलिसांच्या नजरेला पडला. ही घटना भरती केंद्राच्या आवारात घडली. उमेदवार ताकद वाढवण्यासाठी स्टेरॉइडचा वापर करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसले. या प्रकारामुळे संपूर्ण भरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कोण होता उमेदवार?
या प्रकरणातील आरोपीचे नाव साहिल अवघडे आहे. तो बारामती (पुणे जिल्हा) येथील रहिवासी आहे. पोलीस भरतीत चांगला स्कोअर मिळवण्यासाठी त्याने स्टेरॉइड इंजेक्शन घेतल्याचे त्याने प्राथमिक चौकशीत कबूल केले. युवकांना ताकद वाढवण्यासाठी असा चुकीचा मार्ग अवलंबण्याची वाढती प्रवृत्ती यातून दिसून येत आहे.
कसा सापडला?
पोलीस भरती केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था होती. सीसीटीव्ही कॅमेरे सतत नजर ठेवत होते. साहिलने इंजेक्शन घेताना तो थेट कॅमेर्यात कैद झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला पकडले. त्याच्याकडून स्टेरॉइडची सिरिंज आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले. रंगेहाथ पकडल्याने त्याला बचावाची संधी मिळाली नाही.
पोलिसांची कारवाई
मिरा-भाईंदर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. साहिल अवघडेविरुद्ध औषधे आणि कॉस्मेटिक्स कायद्यानुसार तसेच भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणे याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.अशा प्रकारचे गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल आणि भरती प्रक्रिया स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
पारदर्शकतेवर प्रश्न
या घटनेने महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. तरुण उमेदवारांच्या हलगर्जीपणाबद्दल आणि भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “फक्त शारीरिक क्षमता नव्हे तर नैतिकता आणि स्वच्छ चारित्र्यही तपासले पाहिजे.”, असे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. यामुळे आता भरती केंद्रांवर अधिक कडक नजर ठेवली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.