Cold Wave in Maharashtra: राज्यात सध्या तापमानाचा पारा घसरला असून, संपूर्ण महाराष्ट्र थंडीने कुडकुडत आहे. राज्यात थंडीची लाट असून, अनेक शहरांचा पारा 10 अंशांवर पोहोचला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्र गारठला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाताळपर्यंत वातावरण असंच राहणार आहे. यामुळे महाराष्ट्राला पुढील काही दिवस थंडीची सामना करावा लागणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतातही कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान विभागाने भारताच्या अनेक राज्यांमध्ये शीत लहरीचा इशारा दिला आहे.
सोमवारी, मंगळवारी किमान तापमानात किंचित वाढ होईल. गुरुवारपासून किमान तापमान घसरण्यास सुरुवात होईल. नाताळपर्यंत हुडहुडी कायम राहील असं हवामान विभागाने दिलं आहे.
10 अंशापर्यंत घसरला पारा
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच शहरांचा पारा 10 अंशांपर्यंत घसरला आहे. अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, बारामती, नांदेड, जेऊर, धाराशिव, जळगाव, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या सर्व शहरांत किमान तापमानाची नोंद 10 अंश सेल्सिअस एवढी झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता
आज मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्राला यलो अलर्टचा इशारा दिला आहे. तसंच राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात कुठे किती नोंदवले गेले किमान तापमान ?
मुंबईत 16.6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर महाबळेश्वरमध्ये 12.9 अंश तापमान आहे. जेऊरला पारा 6 अंशापर्यंत घसरला असून, जळगावात 7 आणि पुणे, मालेगावमध्ये 8 अंशापर्यंत घसरल्याने कडाक्याती थंडी पडली आहे. नाशिकमध्ये तापमान 8.6 अंशापर्यंत आलं आहे. बारामतीत पारा 7.7 अंशापर्यंत घसरला आहे.
भंडारा, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, नांदेड, सातारा, सांगली येथे तापमान 10 ते 11 अंशापर्यंत आहे.