अकोला : अकोल्यात पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीचं मृत्यू प्रकरण अकोला पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांहून जास्त काळ दडपून ठेवले होते. या प्रकरणात आणखी मोठी अपडेट समोर येत आहे. अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपण कोल्हेंच्या बदलीनंतर आता नॉटरीचेबल असलेल्या तब्बल पाच पोलिसांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. ठाणेदार कोल्हे यांची शनिवारी पोलीस नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. तर या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

दरम्यान, जानेवारी महिन्यात गोवर्धन हरमकार या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे आणि पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके, या 4 पोलिसांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल झाले आहे. सध्या पीएसआय राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके अटकेत आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले, तेव्हापासून अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव हे नॉटरीचेबल होते. आता या पाचही कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ही बदलीची कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सीएयडी करीत आहे.

आतापर्यत अकोट पोलिसांवर झालेली कारवाई : 

  • गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणात आतापर्यत चार पोलिसांवर खुणाचे गुन्हे दाखल
  • PSI राजेश जवरेसह, पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके अटकेत. तर दोन अज्ञात पोलीस कर्मचारी फरार
  • चौकशीत अडथळा ठरू नये म्हणून, अकोटच्या ठाणेदारावर तपण कोल्हे यांच्यावर बदली कारवाई
  • मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील आता बदलीची मोठी कारवाई
  • वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा

दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

या प्रकरणात आरोप असलेला पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळंके या दोघांचं आधी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान वैद्यकीय अहवालानूसार मृतक गोवर्धन याच्या अंगावर जखमा असून मारहाणीमूळे त्याचा मृत्यु झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळ आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरुन दोघांनाही निलंबित करण्यात येत, असे आदेशात नमुद आहे. अकोटचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक अहवाल तयार केला आहे. याच अहवालानुसार जवरेसह तिघांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता जवरेसह दोषींच्या बडतर्फीची मागणी नातेवाईक करीत आहेत. जवरे सध्या अकोला कारागृहात आहे. 

15 जानेवारीला नेमकं काय घडलं होतं?

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पूतण्या गोवर्धन याला ताब्यात घेतलं. त्यानंतर 16 जानेवारीला त्याला त्याच्या सुकळी या गावात आणत घरझड़ती घेतली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. पुढे पोलिसांनी गोवर्धनसह त्याचे सध्या तक्रारदार असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजेदरम्यान दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती, एवढ्यावरच न थांबता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून क्रूरतेचा कळस गाठला. 

खाजगी दवाखान्यात उपचार करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

या गंभीर मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडं तुटली. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवायचा सल्ला दिला. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भीतीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आलं. 

मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती, असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

प्रकरण दाबण्यासाठी अकोल्यातच केले अंत्यसंस्कार 

गोवर्धनचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. त्याचे कुटूंबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांनी मृतदेह गावी नेण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांना धमकावत त्यांच्याकडून आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचं जबरदस्तीने लिहून घेण्यात आलं. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देण्यात आला. गावात अंत्यसंस्कार झाले असते तर, प्रकाराचा बोभाटा झाला असता म्हणून अकोल्यात घाईघाईत गोवर्धनवर अंत्यसंस्कार करवून घेतल्याचं बोललं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..



Source link