El Nino effect on Monsoon 2026 : अल-निनोचा महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना पहिला मोठा फटका बसला आहे. पुण्यात 15 टक्के तर मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे. पुण्यात उन्हामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणीकपात करावी लगाणार आहे. मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे. अल-निनोच्या फटक्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे.
1 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागु होणार
अल नीनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असून, मुंबईत 1 मेपासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पालिका प्रशासनाकडून 10 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. सात धरणांत सध्या 33.60 टक्के पाणीसाठा आहे. ७ जुलैपर्यंत पुरेल इतका साठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढून पाणीसाठ्यात घट होऊ शकते. पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे. मोडक सागर, तानसा, भातसा, वैतरणा आदी 7 धरणांतून दररोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. वर्षभरासाठी 14.47 लाख दशलक्ष लिटर आवश्यक पाणीसाठा लागतो. मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याची गरज आहे.
धरणातील पाणीसाठा – 15 एप्रिल 2026
– भातसा : २,३५,४३९ दशलक्ष लिटर (सर्वाधिक)
– मध्य वैतरणा : ६९,१०६
– अप्पर वैतरणा : ७७,०४५
– तानसा : ४०,८१७
– मोडक सागर : ४५,३४०
– विहार : १५,३५३
– तुळशी : ३,२७४
तीन वर्षांची तुलना (टक्के)
२०२६ : ३३.६०%
२०२५ : ३०.२४%
२०२४ : २४.५४%
राज्य सरकारच्या सूचनेनुसार यंदा जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. 1 मेपासून कपात लागू केल्यासच मुंबईकरांना अखंडित पाणीपुरवठा राखता येईल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे .
पुणे शहरात 15 टक्के पाणी कपात?
हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवल्याने, तसेच खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एमआयडीसीला दरमहा 15 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पुणेकरांना आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच पाणीटंचाईचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे मॉन्सून कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार, भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत.
पुण्यात कुठल्या धरणात किती पाणीसाठा
खडकवासला: ४३ टक्के
पानशेत: ५६ टक्के
वरसगाव: ४६ टक्के
टेमघर: ११.८८ टक्के
एकूण पाणीसाठा: ४५ टक्के
गेल्या वर्षी पाणीसाठा (आजच्या तारखेला): ४१ टक्के