Pawar vs Pawar In Baramati: आता बारामतीमध्ये पुन्हा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार नाही, पवार विरूद्ध पवार सामना होत असेल तर बारामती निवडणुकीत माघार घेणार आणि दुसरा मतदारसंघ शोधणार अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतलीय. तर त्यांच्या या भूमिकेचं सत्ताधा-यांनी स्वागत
केलंय.
बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार लढत होणार नसल्याचे थेट संकेत खासदार सुप्रिया सुळेंनी दिले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा थेट सामना झाला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय तर सुनेत्रा पवारांना पराभवास सामोरे जावं लागलं होतं, मात्र 2029मध्ये आता पवार कुटुंबात सामना होणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय. तर कुटुंब आणि राजकारण वेगळंच आहे, सुप्रियाताई योग्यच बोलल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय.
सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सहमती दर्शवली आहे, सुप्रिया सुळेंनी विचारपूर्वक भूमिका मांडल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय.
सुप्रिया सुळेंनी रोड मॅप आखून दिल्याचं म्हणत छनग भुजबळांनीही सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय, तर देर आये दुरूस्त आये असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुप्रिया सुळेंना मात्र टोला लगावला आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमनेसामने आले होते, तर दुसरीकडे विधानसभेतही युगेंद्र पवार आणि अजित पवार मैदानात होते, मात्र आता पवार विरूद्ध पवार सामना होणार नसल्याचं सुळेंनी सांगितलं, बारामतीमधून सुप्रिया मागील अनेक वर्षांपासून निवडून येतायत त्यामुळे 2029मध्ये कोण माघार घेणार आणि कोण दुसरा मतदारसंघ शोधणार याकडे आता लक्ष लागलंय.
सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्र्यांचा टोला
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.मुंबई-पुणे प्रवासादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीत सुळेंना 2 तास अडकून राहावं लागलं.या वाहतूक कोंडीचा व्हीडिओ सुळेंनी पोस्ट केला.यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनीही सुळेंना टोला लगावला. सुप्रियाताईंनी पोस्ट केलेला वाहतूक कोंडीचा व्हीडिओ बघितला. मात्र यापुढे त्या वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत.त्यांच्या सरकारनं थांबवलेलं काम आम्ही पूर्ण केलं, असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला.दरम्यान, माधुरी मिसाळ यांनीही यावरून सुळेंना टोला लगावला…टिप्पणी करा पण चांगल्या कामाचं कौतुकही करा, असा सल्ला माधुरी मिसाळ यांनी सुप्रिया सुळेंना दिलाय. तर हे सरकार केवळ इव्हेंट सरकार आहे.अटलसेतू आणि मिसिंग लिंक वरून तुम्ही लवकर याल पण पुढे काय, असा सवाल शशिकांत शिंदे यांनी विचारलाय.