Pratap Sarnaik Vs Narendra Mehta : मुंबईच्या वेशीवर असलेलं मिरा भाईंदर शहर सध्या राजकीय वादामुळे चर्चेत आले आहे. या शहरात महायुतीचा मंत्री विरुद्ध महायुतीचा आमदार असा संघर्ष निर्माण झालाय. शिवसेनेचे ओवळा माजिवड्याचे आमदार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे मिरा भाईंदर मतदारसंघाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या विस्तवही जात नाही. दोघांमधील वादाची ठिणगी दहिसर ते काशीगाव मेट्रोचे उद्घाटनादरम्यान पडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मेट्रोतून प्रवास करताना सरनाईकांनी मेहतांची थेट मुख्यमंत्र्यांकडं तक्रार केली.
मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील हा वाद इथंच थांबेल असं वाटलं होतं. पण दोघांमधील वाक् युद्धाची ही तर सुरुवात होती. प्रताप सरनाईकांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत मेहतांवर आरोपांचा बॉम्बगोळा टाकला. सरनाईकांचा शाब्दिक हल्ला मेहतांनी लगोलग परतावून लावला.
या वादानंतर नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांवर भाईंदरपाड्यातील भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप करत ठाणे पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहतांना नोटीस बजावली आणि या जमिनीचा आपल्याकडे कायदेशीर ताबा असून ती बळकावलेली नाही. त्यामुळे बदनामी करणे थांबवावे. अन्यथा, दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटिसीद्वारे दिला. या घटनेमुळे सरनाईक-मेहता यांच्यातील जुन्या वादाला नव्यानं हवा मिळाली.
सरनाईक-मेहता वादावर भाजपनं सारवासारव केलीय. हे पेल्यातलं वादळ आहे ते लवकरच शांत होईल असा विश्वास भाजपनं व्यक्त केला. सरनाईक आणि नरेंद्र मेहता दोघंही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. येत्या काळात हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यताच जास्त वाटू लागलीये.
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली
भाईंदरपाडाप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपने आमदार नरेंद्र मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. भाईंदरपाड्यातील जमिनीचा आपल्याकडे कायदेशीर ताबा असून ती बळकावलेली नाही. त्यामुळे बदनामी करणे थांबवावे. अन्यथा, दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटिसीद्वारे दिला आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाणे पोलिसांकडे केली होती. याविरुद्ध आता विहंग ग्रुपनेही मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. आरोप थांबवून प्रकल्पाच्या कामातील हस्तक्षेप थांबवावा, सात दिवसांत तक्रारीही मागे घ्याव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.