Raj Thackeray Audio Clip Viral: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी उपस्थित केलेला ‘मत चोरी’चा मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भ देत कार्यकर्त्यांना मतदारयादीकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी आपण यापूर्वीच हा मत चोरीचा मुद्दा मांडला होता असंही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं.

राज ठाकरे त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाले? वाचा संपूर्ण भाषण

राज ठाकरेंनी पुण्यातील या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे? या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे वाचा राज ठाकरेंचं हे छोटेखाणी भाषण जसच्या तसं…

“या मतदानामध्ये गडबड आहे हे मी केव्हापासून बोलतोय, बरोबर? या सगळ्या गोष्टींसाठी मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो. इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्याबरोबर आले आणि आमची पत्रकार परिषदही झाली. आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी. मी त्याचवेळेला सांगत होतो लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याची जागतिक बातमी होईल. आता ते राहुल गांधींनी हे सगळं प्रकरण परत बाहेर काढलं. मी तेव्हापासून सांगतोय, आपल्याला मतदान होत नाही असं तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जातात. त्यामुळे तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. या मतांची चोरी करत करत हे सगळे सत्तेवरती आहेत.

तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजपाने 132, शिंदे 56, अजित पवार 42 जागा जिंकले. एकूण 232 च्या आसापास जागा जिंकल्या. एवढं संपूर्ण बहुमत मिळूनही संपूर्ण महाराष्ट्रात एवढा सन्नाटा पसरला होता. कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता? याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं. पचत नव्हतं. जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं. कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता. त्या मतांच्या गोंधळामुळे 2014 पासून सत्ता राबवल्या गेल्या आहेत.

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली असेल तुम्ही. त्यांनी राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला सांगितलं. केंद्रात विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत राहुल गांधी! त्याचवेळी त्या ठाकुरांनी, अनुराग ठाकुरांनी सहा मतदारसंघाचं काढलं. तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे, अरे विरोधी पक्ष पण बोलतोय आणि सत्ताधारी पक्ष पण बोलतोय. मग या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती. मात्र हे सगळं प्रकरण दाबलं जात आहे. याचं कारण गेल्या 10-12 वर्षांचा सगळा खेळ उघडा पडेल. यांना जर तुम्हाला निवडणुकीत उघडं पाडायचं असेल जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवर काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही.”

राज ठाकरेंच्या या आरोपांवर आता सत्ताधारी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

FAQ

राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत काय मुद्दा उपस्थित केला?
राज ठाकरे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणुकीत मत चोरी होत असल्याचा आरोप केला. त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या ‘मत चोरी’च्या मुद्द्याला पाठिंबा देत मतदार यादीकडे लक्ष देण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं?
राज ठाकरे यांनी सांगितलं की, मतदान प्रक्रियेत गडबड आहे आणि मते चोरली जातात, ज्यामुळे मनसेला पराभव पत्करावा लागतो. त्यांनी 2014 पासून मतांच्या गोंधळामुळे सत्ताधारी सत्ता राबवत असल्याचा दावा केला. तसेच, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी न करता ते दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.

राज ठाकरे यांनी कोणत्या नेत्यांशी यापूर्वी मत चोरीबाबत चर्चा केली होती?
राज ठाकरे यांनी शरद पवार, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्याशी मत चोरीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला होता, पण विरोधी पक्षांनी आयत्या वेळी माघार घेतली.

2024 च्या विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांनी काय म्हटलं?
राज ठाकरे यांनी सांगितलं की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132, शिंदे गटाने 56 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 42 जागा जिंकल्या, म्हणजेच एकूण 232 जागा मिळाल्या. तरीही महाराष्ट्रात विजयाचा जल्लोष नव्हता आणि सन्नाटा होता, कारण मतांचा गोंधळ झाला होता.

निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी कोणती टीका केली?
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीच्या आरोपांची चौकशी न केल्याचा आणि प्रकरण दाबण्याचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की, राहुल गांधी आणि सत्ताधारी पक्षाचे अनुराग ठाकुर दोघेही मत चोरीबाबत बोलत असताना आयोगाने कारवाई करायला हवी होती.





Source link