by Hansraj Agrawal | Apr 4, 2024 | Trending News
Pune Khadakwasla Dam: उन्हाळा सुरू झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने उन्हाने काहिली झाली आहे. एकीकडे उकाडा वाढत आहे तर, पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. पाणीसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उन्हाळ्यातील पाणीवाटपाचं नियोजन करण्यात आले. तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. (Pune Water News)
कोणत्याही परिस्थितीत मेट्रो प्रकल्पासह बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करु नये, अशा स्पष्ट सूचना भोसले यांनी दिल्या आहेत. तसंच, या सूचना पाळल्या नाहीत तर बांधकामे ठप्प होतील, असा इशारादेखील दिला आहे. मात्र मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी बांधकामासाठी वापरण्यास बांधकाम व्यावसायिकांचा विरोध आहे. मात्र, असं असलं तरी पिण्याच पाणी बांधकामासाठी वापरता येणार नाही. 34 गावाच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली.
पिण्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरण्यास नेहमीच बंदी घालण्यात आली आहे. तथापि, पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका, त्याऐवजी बोअरवेल किंवा एसटीपी सारख्या पर्यायांचा वापर करा, असे पुन्हा सर्वांना बजावले आहे. शिवाय, येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही सर्व नियमांचे उल्लंघन करून पिण्याचे पाणी कोण वापरत आहे हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करणार आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास पालिकेकडून संबंधितांना नोटिस पाठवण्यात येईल आणि दंड ठोठावला जाईल, असं पालिकेने म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यातील सहा विभागांमध्ये आज 36.71 टक्के पाणीसाठा आहे. 14,862 दलघमी पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात 37.54 पाणीसाठा उपलब्ध आहे तर पुणे विभागात 720 धरणांचा पाणीसाठी 35.30 टक्के इतका झाला आहे. नागपुर विभागात 48.24 टक्क्यांवर गेला असून अमरावती विभागात 48.62 टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात 920 धरणांमध्ये केवळ 18.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 3, 2024 | Trending News
Gadchiroli-Chimur Lok sabha 2024: गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ… निबिड, घनदाट अरण्याचा प्रदेश… गडचिरोलीतील 3, चंद्रपूरमधील 2 आणि गोंदिया जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ… दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळं कायम मागास जिल्ह्यांच्या यादीत समावेश असलेला हा भाग… भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असेला हा प्रदेश गेल्या अनेक वर्षात गडचिरोली अन् विकास यांचा संबध तुटला आहे. प्रशासन आणि व्यवस्था यांच्यात गुरफटलेला हा भाग कधी विकासाच्या रुळावर आलाच नाही.
गडचिरोली चिमूर… समस्या भरपूर
इथं फोफावलेला नक्षलवाद विकासाच्या वाटेतला सर्वात मोठा अडसर ठरतोय. उद्योगविहीन असा हा भाग, मात्र सुरजागड लोह खनिज खाण, चुंबक खाणी, स्टील आणि स्पॉन्ज आयर्न उद्योग लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. आदिवासीबहुल भाग, वनसंवर्धन कायद्यामुळे सिंचन सोयी नसल्यात जमा आहेत. वाघ, बिबट आणि रानटी हत्तींमुळं मानव आणि वन्यजीव संघर्ष हा दैनंदिन जगण्याचा भाग झालाय. शासकीय मेडिकल कॉलेज अजून कागदावरच असल्यानं आरोग्य सुविधांची बोंब आहे. वडसा हे एकमेव रेल्वे स्टेशन गडचिरोली चिमूरमध्ये आहे.
गडचिरोलीचं राजकीय गणित
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2008 मध्ये हा गडचिरोली चिमूर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. राजकीयदृष्ट्या दीर्घकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता भाजपचं कमळ इथं चांगलंच फुललंय. 2009 मध्ये काँग्रेसच्या मारोतराव कोवासे यांनी भाजपच्या अशोक नेतेंचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र 2014 मध्ये भाजपच्या अशोक नेते काँग्रेसच्या नामदेव उसेंडींना धूळ चारून खासदार झाले. 2019 मध्ये याच निकालाची पुनरावृत्ती झाली. नेतेंनी दुसऱ्यांदा उसेंडींना पाणी पाजलं. विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर भाजपचे 3, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आमदार आहे.
मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी लोकसभेच्या रणांगणात उतरावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं जोर लावला. मात्र भाजपनं विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी विद्यमान खासदार अशोक नेतेंना पुन्हा उमेदवारी दिलीय. तर दुसरीकडं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं होमपीच असलेल्या मतदारसंघात त्यांनी नामदेव किरसान यांच्यासाठी तिकीट खेचून आणलं. किरसान यांच्या उमेदवारीमुळं नाराज झालेले काँग्रेस नेते नामदेव उसेंडी यांनी भाजपात प्रवेश करून बंडाचा झेंडा फडकवला. गेल्यावेळी वंचितच्या रमेश गजबेंनी इथून लाखभर मतं घेतली होती. यंदा वंचित बहुजन आघाडीनं हितेश मडावी यांना उमेदवारी दिलीय. तरीही थेट लढत भाजपचे नेते आणि काँग्रेसचे किरसान यांच्यातच होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 3, 2024 | Trending News
LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं असून, आपल्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. भाजपाने अमरावतीत बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांच्या नाराजीला सुरुवात झाली होती. त्यांनी जाहीरपणे आपण नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
“ही निवडणूक नाही तर जनआंदोलन आहे हे सिद्ध करुन दाखवणार आहे. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता स्वाभिमानाने समोर येईल. नेते लाचार झाले आहेत, पण कार्यकर्ता लाचार झालेला नाही. आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश बुब यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
“अमरावती लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये कोणाची लाट नाही. एक नकार मात्र नक्की आहे. नवनीत राणा नको, अशी लोकांची भावना आहे. भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तरी तुम्ही सांगेल की ज्यांनी आमचं कार्यालय फोडलं, भाजपाच्या कार्यकत्याला रक्तबंबाळ केलं, पालकमंत्र्यांना ‘बालकमंत्री’ म्हटलं. त्यामुळे हे भाजपचे लोकही फक्त त्यांच्यासोबतआहेत. पण आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत आणि आमचा उमेदवार जिंकणार,” असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
“भाजपाने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये. त्यांना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, ते पाहिलं गेलं पाहिजे. भावना गवळी त्या ठिकाणी पाच वर्षांपासून खासदार आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे. मी फक्त अमरावती पुरताच बोलेन,” असंही ते म्हणाले.
आशिष शेलार यांचं उत्तर
आशिष शेलार यांना बच्चू कडू यांच्या एकनाथ शिंदेंबाबतच्या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावं असं उत्तर देण्यात आलं. “बच्चू कडू यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावं. एकनाथ शिंदे यांना आम्ही सर्व मित्रपक्षांनी मजबुतीने मुख्यमंत्री पदावर बसवलं आहे,” असं आशिष शेलार म्हणाले.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 2, 2024 | Trending News
Pune Loksabha election 2024 : वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेच्या जागेवर मनसेला रामराम ठोकणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी जाहीर केली. वसंत मोरे अपक्ष लढणार, असं निश्चित मानलं जात असताना आता वंचितने वसंत तात्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता पुण्यात (Pune Loksabha ) तिरंगी लढत होणार हे निश्चित झालंय. एकीकडे भाजपचे मुरलीधर मोहोळ तर दुसरीकडे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील वसंत मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आता वंचितकडून (Vanchit Bahujan Aghadi) तिकीट मिळाल्यानंतर वसंत मोरे यांचं फटाके फोडत स्वागत करण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय ‘वंचित बहुजनांसाठी’ मी मैदानात येतोय. बदल घडणार अन् वसंत फुलणार, असं ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे. माझ्या विकासाचा पॅटर्न मी आता संपूर्ण पुण्यात गाजवणार. गेली 15 वर्ष मी इथं काम करतोय, आता देखील संपूर्ण शहराच्या विकासाचा ध्यास घेणार आहे. सुरूवातीपासून मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं. मला संधी दिली त्याचं सोनं मी करेल आणि पुणे शहराचा खासदार म्हणून मी काम करण्यास तयार आहे. मी शेतकरी कुटूंबातील असल्याने आता मी सर्व समाजासाठी अग्रेसर असेल, असं वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
वसंत मोरेंचा मास्टरस्ट्रोक
एकीकडे वसंत मोरे यांनी वंचितकडून तिकीट मिळवलंय. तर दुसरीकडे सकल मराठा समाजाला देखील आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. वसंत मोरे यांनी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली. त्यामुळे आता वसंत मोरे यांनी वंचित तसेच मराठा समाजाची मतं देखील ताकद देऊ शकतात. तर राष्ट्रवादीची मतं वसंत मोरे यांच्या पदरी पडणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. वंचितने पाच उमेदवारांची यादी (Vanchit candidate List) जाहीर केली. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात वंचित उमेदवार देणार नाही, अशी घोषणा देखील केली आहे. बारामतीत शरद पवार गटाला वंचितचा पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलंय.
सुप्रिया सुळे म्हणतात…
बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 2, 2024 | Trending News
Pune Crime News 11 Standard Girl Attacked In Shukravar Peth: सदर घटना दुपारच्या सुमारास घडली जेव्हा ही पीडित विद्यार्थिनी तिच्या 3 मैत्रीणंबरोबर चालत घरी जात होती. संपूर्ण घटनाक्रम चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Apr 1, 2024 | Trending News
Solapur Loksabha : आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना खरमरीत वेलकम पत्र लिहित प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) प्रचाराचा नारळ फोडला होता. अशातच आता मी लेक सोलापूरची.. या टॅगलाईनवर प्रणिती सध्या भर देताना दिसून येत आहेत. यावेळी भाजपवर प्रणिती शिंदे या जोरदार प्रहार करतायत. भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावलीय, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमधील सभेत बोलताना केली. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे.मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मागच्या 10 वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिल.मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला, भाजपने तुम्हाला धोका दिला. तुमचा विश्वासघात केला. मागच्या 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं हा एकच प्रश्न त्यांना विचारा,त्यांची बोलती बंद होईल. ऐन इलेक्शनच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला, म्हणजे ही लोक आपणाला भीक देतायत की काय? यांच्याकडे आमदारांना विकत घ्यायला 50 कोटी आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रातोरात अटक करतात. जर 400 पार होणार याबद्दल तुम्हला एवढा आत्मविश्वास आहे तर एवढी भीती का आहे तुम्हला? ही लोक 400 सोडा मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीयेत,कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे. समोरून उज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात. धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडरवरती काय शिजवायचं..? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी विचारला आहे.
हाथी के दांत दिखाणे के एक और खाणे के एक, यांच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज 20 वर्ष मागे गेलाय,तर आपला देश 50 वर्ष मागे गेलाय. आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे. धर्म आणि जातं करून लोकांमध्ये तेढ निर्माण करतायत,आधी आपण असे नव्हतो. निवडणूकीच्या वेळेस आपण सर्वधर्म समभावावर मतदान करायचो. सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करताय. ज्या दिवशी असं व्हायला लागेल त्यादिवशी लोकशाहीलां खतरा निर्माण व्हायला लागतो. म्हणून जागे व्हा, ते फक्त गाजर दाखवत आहेत, अशी जबरी टीका प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.
मी एकमेव आहे जी विधानसभेत भाजप विरोधात बोलते. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या, मग बाकी ते टेन्शन माझं. मी इडीबिडीला घाबरत नाही, असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही, असं आश्वासन देखील प्रणिती शिंदे यांनी दिलं आहे.
Source link