Maharashtra Weather Update: राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने नागरिकांची चिंता वाढवली होती. मात्र आता हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरतोय. विकेंडला नागरिकांना थंडीचा सुखद अनुभव घेता येणार आहे. सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
Add Zee News as a Preferred Source
उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे. राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात किमान तापमान 11 अंशाच्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याने कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे.
राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आणि हुडहुडी कायम आहे. किमान तापमानाचा पारा 10 अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे असे समजले जाते.
मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा 16 ते 17 अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे गारेगार झालेल्या मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभवता येणार आहे. मुंबई शेजारचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचे किमान तापमान 18 नोंदविण्यात आले.
14 ते 20 नोव्हेंबर आणि 21 ते 27 नोव्हेंबर या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
FAQ
प्रश्न १: राज्यात थंडी का वाढू लागली आहे?
उत्तर: उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे.
प्रश्न २: सध्या राज्यातील तापमानाची स्थिती काय आहे?
उत्तर: राज्यातील बहुसंख्य शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरू लागला आहे आणि थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे.
प्रश्न ३: थंडीची लाट येण्याची शक्यता कोणत्या भागात आहे?
उत्तर: उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे, तसेच राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
Pune Accident CCTV: पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघात 8 जणांचा मृत्यू झाला असून, 17 जण जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने रस्त्यात येणाऱ्या सर्व गाड्यांना उडवलं आणि अखेर पेट घेतला. या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. सीसीटीव्हीत आगीत वेढलेला कंटनेर रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. या व्हिडीओतूनच हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येत आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Add Zee News as a Preferred Source
कंटेनरने 20 ते 25 वाहनांना चेंडूप्रमाणे उडवत त्यांचा अक्षरश: चुराडा केला आहे. अपघात इतका भीषण होता की, दोन कंटेनरच्या मधे एक कार अडकली होती. अपघातामुळे कंटनेरला आग लागल्यानंतर ही कार प्रवाशांसह जळाली. आगीनंतर कारची राख झाली आहे. कंटनेर चालकही अपघातात ठार झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
कंटनेर नवले पुलाच्या पुढे असणाऱ्या बोगद्यातून पुण्याच्या दिशेन येत होता. उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनरने समोर येतील त्या सगळ्या गाड्यांना धडक दिली. चेंडूप्रमाणे गाड्या रस्त्यावर उडत होत्या. जवळपास 3 किमी कंटेनर वाहनांना धडक देत होता. 20 ते 25 गाड्यांना कंटेनरने धडक दिली. एका क्षणी कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला धडक दिली. यावेळी कार दोन्ही कंटेनरच्या मधे अडकली आणि आग लागली. कार बाहेर पडण्यासाठी जाग नसल्याने आतील प्रवाशांसह ती जळाली आणि राख झाली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागल्यानंतर क्रेनच्या माध्यमातून कंटेनर आणि कारला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच अपघातग्रस्त वाहनांना बाजूला काढण्यात आलं. रस्त्यावर काचा आणि रक्ताचा सडा पडला आहे.
गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला असून लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. तसंच अपघातानंतर तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काही दुचाकींनाही कंटेनरने धडक दिली. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवारांची पोस्ट
पुण्यातील नवले पुलाजवळ दोन कंटेनरची झालेली धडक आणि त्यामध्ये एका कारचा झालेला भीषण अपघात तसेच त्यानंतर लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी असून मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
Ahmednagar : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीतून आणि वास्तवाशी निगडित भाषणातून लोकांना विचार करायला भाग पाडतात. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं. लेकीच्या साखरपुड्यामधील कपड्यांवर झालेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज यांनी व्यथित होऊन कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
Add Zee News as a Preferred Source
मात्र, या प्रसंगानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी अत्यंत अयोग्य आणि वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर केलेल्या अश्लील आणि अनावश्यक कमेंट्समुळे महाराज मनोमन दुखावले गेले आहेत.
‘लोक खाली गेलेत… माझ्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत’
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात, ‘आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी भेट होत नसे. मी लोकांसाठी धावत राहिलो. पण आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगावरच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत. यापेक्षा वाईट काय असेल? चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या साखरपुड्याचे कपडे चर्चेत आहेत. पण तिच्या बापाला काहीही विचारत नाहीत’.
ते पुढे म्हणाले, ‘तुमच्याही मुली असतील. तिच्या कपड्यांवर कोणी बोललं तर तुम्हाला काय वाटेल? साखरपुड्यात कपडे मुलीकडून घेतले की नवरदेवाकडून? मग त्यावर माझा काय दोष? एवढी तरी लाज असावी ना! 31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना प्रेरणा दिली, उपदेश केला पण आता मजा उरली नाही.
लोकांच्या शिव्या खात खात आयुष्य गेलं पण आता हे व्यक्तिगत पातळीवर गेलं आहे. मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला पण कुटुंबावर बोट गेलं की सहन होत नाही’. त्यांनी असंही स्पष्ट सांगितलं की ते काही दिवसांत एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करून कीर्तन थांबवण्याचा औपचारिक निर्णय जाहीर करतील.
जनतेकडून सहानुभूतीची लाट
सोशल मीडियावर अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘महाराज आमचं प्रेरणास्थान आहेत, त्यांनी कीर्तन सोडू नये’, असे अनेक लोक म्हणत आहेत. काहींनी सोशल मीडियावरील वैयक्तिक टीकेला आळा घालावा अशी मागणीही केली आहे.
इंदुरीकर महाराज हे केवळ कीर्तनकार नाहीत तर ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहेत. त्यांच्या शब्दांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. पण वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवरून केलेली टीका किती खोल जखमा करते हे या प्रसंगातून स्पष्ट झालं आहे.
झी 24 तासने पार्थ पवारचे पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणले. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक घडामोडी झाल्या अखेर हा व्यवहार रद्द करण्यात आला. हे सगळं प्रकरण झी 24 तासने सर्वप्रथम मांडला आणि त्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीचं कौतुक केलं आहे.
Add Zee News as a Preferred Source
अंजली दमानिया यांनी या संदर्भात बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कारण पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाची अजित पवार पदावर असे पर्यंत निपक्ष अशी चौकशी होणार नाही, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
तसेच या प्रकरणाची पार्थ पवार यांना संपूर्ण माहिती होती. एवढेच नव्हे तर पार्थ पवार यांची 99% भागीदारी या जमिनीच्या व्यवहारात होती तरी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असा सवालही अंजली दमानिया यांनी या प्रकरणात विचारले आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी यांनी केली आहे.
झी 24 तासचे मानले आभार
झी 24 तासने पहिल्यांदा या प्रकरणाचा खुलासा केला आणि महाराष्ट्रासमोर हे प्रकरण मांडलं. एवढंच नव्हे तर झी 24 तासने शोधपत्रकारिता करत या प्रकरणाचे वेगवेगळे कंगोरे मांडले. या प्रकरणाची दखल झी 24 तासने सरकारला देखील घ्यायलाच लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष दिलं असून या प्रकरणाचा व्यवहार रद्द केला आहे. त्यामुळे अंजली दमानिया यांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत.
अंजली दमानिया यांचे थेट सवाल
पार्थ पवारांना अटक का नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे त्या स्वतः सगळी कागदपत्रे घेऊन पुणे पोलिसांना भेटणार असल्याच म्हटलं आहे. तसेच त्या कोर्टातही याचिका दाखल करणार आहेत. चौकशी समितीतील 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचेच आहेत. यांनाही या व्यव्हाराची जून महिन्यापासून कल्पना होती. त्यामुळे निष्पक्ष चौकशी कशी होणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
शितल तेजवानीचे डॉक्युमेंट रजिस्टरच नाही, विक्रीकरता सही करण्याचाही अधिकार नाही, असे अनेक सवाल विचारले आहेत. अजित पवारांनी राजीनामा द्यावा, पार्थ पवारांना अटक व्हावी अशी मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री, पुण्याच्या पालकमंत्री असलेल्या मुलाच्या चौकशीकरता नेमलेल्या चौकशी समितीत ६ पैकी ५ अधिकारी पुण्याचेच आहे. तसेच जून महिन्यापासून सदर व्यव्हाराची कलेक्टर आणि इतर अधिका-यांना माहिती होती तेच लोक चौकशी समितीत कसे असु शकतात? असा सवालही अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.