by Hansraj Agrawal | Jun 30, 2025 | Trending News
Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण, तर कुठे चक्क लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळत आहे. अधूनमधून दाटून येणाऱ्या काळ्याकुट्ट ढगांमुळं पावसाची एखादी जोरदार सरसुद्धा हजेरी लावून जात आहे. राज्याच्या काही भागांमध्येसुद्धा हेच चित्र पाहाय़ला मिळत असलं तरीही घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
हवामान विभागानं प्राथमिक निरीक्षणाआधारे वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणाह राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाच्या सरीवर सरी बरसत आहेत आणि त्या अशाच बरसत राहतील. ज्या कारणानं रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे आणि घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, तिथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर पाच दिवस मुसळधार
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर मान्सूनने देशाच्या इतर राज्यांतही जोरदार आगेकूच सुरू ठेवली असून, रविवारी संपूर्ण देश व्यापला. दरम्यान, अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे राहणार आहेत. कोकणाला या जोरदार पावसाचा तडाखा बसेल असं सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण विदर्भ, रायगड, पुणे, उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
देशभरात मान्सून सक्रिय
ठरलेल्या मुहूर्ताआधीच मान्सूचं आगमन झालं आणि पाहता पाहता या मोसमी वाऱ्यांनी सबंध देश व्यापला. सर्वसाधारणपणे 8 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो. देशात सक्रिय होण्यातही मान्सूनने नवा विक्रम रचला. देशात सर्वदूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण पाहायला मिळत असून, सध्या या पावसानं उत्तर भारतामध्ये हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 29, 2025 | Trending News
Maharashtra Police Transfers: महाराष्ट्रात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. गृह खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात एकाचवेळी 51 भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आणि 81 राज्य पोलिस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामाला बळकटी देणे आणि पोलिस यंत्रणा अधिक प्रभावी करणे यासाठी गृह खात्यात हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
बदल्यांच्या या क्रमात, पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची पुण्यातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट १ च्या कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरातील पोलिस उपायुक्त (डीसीपी) महेंद्र पंडित यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांची खंडाळा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. डीसीपी (वाहतूक) अमोल झेंडे यांना दौंड येथील एसआरपीएफमध्ये कमांडरची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांनाही मुंबईतील पोलिस उपायुक्तपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण पाच आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत डीसीपी म्हणून बढती देण्यात आली आहे.
या बदल्यांद्वारे, राज्य सरकारने केवळ मोठ्या शहरांमध्ये पोलिस प्रशासन मजबूत करण्याचा प्रयत्न केला नाही तर महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दिशेने कडक पावले उचलली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात आणखी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. यामुळे राज्यभर पोलिस यंत्रणा अधिक कार्यक्षम करता येईल.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 28, 2025 | Trending News
Sanjay Raut on Raj Thackeray – Uddhav Thackeray : राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेची साथ सोडली आणि नवीन पक्षाची स्थापना केली. राजकीय मतभेदामुळे काका बाळासाहेब ठाकरे आणि भाऊ उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आज 2025 मध्ये हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठी माणसासाठी एकत्र येणार आहे. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी दोन्ही भाऊ अनेक वर्षांनंतर एकाच विषयासाठी सरकारविरोधात उभे राहणार आहेत. पण या दोन भावांचं मनोमिलन कसं झालं. या दोघा भावांमध्ये संवाद आहे का? याचं नेमकं कारण खासदार संजय राऊत यांनी झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीत सांगितलं आहे.
परद्यामागे एक पटकथा कोण लिहितंय?
या मुलाखात संजय राऊत म्हणाले की, पटकथा लिहिली जातेय म्हणून तर उद्याचा मोर्चा एकत्र होतोय ना. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील लोकांची ही इच्छा आहे. महाराष्ट्रात जसंजसं आक्रमण दिल्ली आणि गुजरातचे वाढत आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रात हल्ले होत आहेत. तेव्हा लोकांच्या मनात एकच भावना आहे की, मराठी माणसांमध्ये फूट पडल्यामुळे आमच्यावर आक्रमण होतं आहे. यासाठी मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. जी बाळासाहेबांची अभेद संघटना होती मराठी माणसांची ती निर्माण व्हायला पाहिजे. ही लोक भावना आहे. मग लोक भावनेमध्ये काय मुद्दा असतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राच्या दुश्मनाशी लढता येणार नाही. हे ठाकरे ब्रँड आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे. बाकी कोणी एकत्र नाही आले तरी चालेल. लोकांची भावना काय आहे की ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे. आम्ही असं ठरवले म्हणजे उद्धव ठाकरे यांनी असं ठरवलं की, वारंवार आपल्या बाबतीत हा प्रश्न विचारला जातो, शिवसेना मनसेला सोबत घ्यायला तयार नाही. आणि म्हणून एकत्रिकरण होत नाही आहे. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या एका मुलाखतीतून ऐक्याची साद घातली. सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्र संकटात आहे. लचके तोडले जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून.
ब्रँड ठाकरे म्हणजे नेमकं काय?
पुढे ते म्हणाले की, अशात उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब पुढल्या 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे यांच्या जी साद होती त्याला प्रतिसाद दिला. की आम्ही तयार आहोत. आपल्यामध्ये काही मतभेद असतील, काही इतर विषय असतील ते संपवून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी मी हात पुढे करायला तयार आहे. याचा एक चांगला परिणाम झाला. जशी वीज चमकावी अशी महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झाली मराठी लोकांमध्ये. लोकाही म्हणाले हे छान आहे, हे व्हायलाच पाहिजे. त्यानंतर अशा अनेक घडामोडी प्रक्रिया होतात. जसा आता हा विषय आहे, मराठी भाषेवर जी लादली जाते आहे हिंदी भाषा त्यानिमित्ताने दोन पक्ष आपल्या आपल्या भूमिका मांडत असताना दोघांनी आपली कार्यक्रम ठरवले. पण हा विषय इतका गंभीर आहे की, लोकांना आवडणार नाही. काल आम्ही निर्णय घेतला, 7 जुलैला मोर्चा काढण्याचा कृती समितीसोबत. तेव्हा मी बाहेर आलो मातोश्रीच्या तेवढात राज ठाकरेंचा फोन वाजला. आम्ही जुने मित्र आहोत. तेव्हा राज ठाकरे म्हणाली की, संजय बघा मी आताच पाहिलं शिवसेना 7 जुलैला मोर्चा काढणार आहे. आम्ही 6 जुलैला मोर्चा काढणार आहोत. दोघांचे विषय एकच आहे. थोडं बरं दिसणार नाही, एकाच विषयावर दोन मराठी माणसांचा विचार करणारा संघटना वेगवेगळे मोर्चे काढत आहेत. हे चित्र थोड वेगळे दिसेल. त्यावर मी म्हणालो हो, हे चित्र नक्कीच वेगळं दिसेल. मग काय करायला पाहिजे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की आपण एकत्र मोर्चा काढला पाहिजे. मी लगेचच गाडीतून उतरलो आणि मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मी म्हटलं की राज असं म्हणतोय आणि मला त्याची भूमिका योग्य वाटतेय. उद्धव ठाकरे यांनी क्षणाचाही विचार न करता योग्य आहे. आपल्या माहिती नाही, त्यांनी मोर्चा जाहीर केला ते. एकाच वेळी दोन पत्रकार परिषद झाल्यात. अशात आपण काय करायला पाहिजे. तेव्हा मी म्हणालो, आपल्या मनात मराठी माणसासाठी कोणताही किंतूपंरतू नाही. आपण याला सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे.
…म्हणून मोर्चाची तारीख बदलण्यात आली!
आणि फक्त मुद्दा एवढाच आहे की, आपला मोर्चा 7 जुलैला सोमवारी आहे आणि त्यांचा 6 जुलैला आहे. आपण सुद्धा 6 तारखेचा विचार करत होतो, रविवार म्हणून…पण 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला मुंबई असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल हा विठ्ठल भक्तीमध्ये दिंड्या पताका देव्हळ्यात जाणं. पूजा अर्चा करणं. त्यामध्ये लोकं अडकलेले असतील. आपला जो विचार आहे, संघर्ष लोकांपर्यंत जाणार नाही. म्हणून आपण 7 तारखेला ठेवला आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. दिवस बदलता येतोय का पाहा. आमची ही स्पष्ट भूमिका आहे, मी परत बाहेर येत राज ठाकरेशी बोललो.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलत आहेत का?
संजय राऊत म्हणाले की, एक लक्षात घ्या ते दोन भाऊ आहेत. लहानपणापासून ते एकत्र राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे असतील, माँ साहेब असतील श्रीकांतजी असतील हे एकत्र कुटुंबच होतं आणि आहे. त्याच्यात तो ओलावा तर आहे. राजकारणात थोडेफार मतभेद झालेत. त्या दोघांनी एकमेकांशी एकत्र चर्चा केली की नाही, हे मी का सांगू? पण हो त्यांच्यामध्ये संवाद नक्कीच आहे. बघा ना संवाद नसता तर उद्याच पाऊल उद्धव ठाकरेंनी टाकलंच नसतं. संवाद आहे, मनातील किल्मिष दूर झाली आहे आणि आपल्याला एकत्र येयचं ही मानसिकता आहे, ही संवाद असल्याशिवाय होत नाही. आणि हा संवाद असायलाच पाहिजे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 28, 2025 | Trending News
Pune News Today: दिव्य शक्ती असल्याची बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाच्या विरोधात पुण्यातील बावधन येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक असलेल्या 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलिस ठाण्यात भोंदूबाबाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याचा बनाव करत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. आरोपीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या मोबाइलमध्ये एक अॅप डाउनलोड करायला सांगितले होते. या अॅपच्या माध्यमातून त्याने त्याच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला. मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच मोबाईलवरील माहितीचा गैरवापर करत अश्लील कृत्य करण्यास तसेच वेश्यागमनास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे.
इतकंच नव्हे तर, फिर्यादीला प्रेयसीबरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते बाबाने पाहिल्याचं फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांना या बाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, त्याच्यावर फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा, लैंगिक शोषणास प्रवृत्त करणे इत्यादी गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, बाबाने या सगळ्याच्या मोबदल्यात, मठाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने फार्यादीकडून 15 हजार रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात घेताच फिर्यादीने थेट पोलिसांत धाव घेतली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 27, 2025 | Trending News
नीतेश महाजन, झी 24 तास, जालना: जालन्यातल्या पारध गावात जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात शिकताना अडथळा येतोय. शाळेभोवती साचलेल्या तळ्यात मोठ्या प्रमाणात बेडूक आलेत. या बेडकांच्या ओरडण्यानं नेमकं शिक्षकांनी काय शिकवलं, हेच विद्यार्थ्यांना कळेनासं झालंय. याबद्दल जाणून घेऊया.
ग्रामीण भागातल्या समस्याचं वेगळ्या असतात. जालन्यातल्या पारध गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मोठा पाऊस पडला आणि शाळेच्या मैदानाचं तळं बनलं. इतकंच नाही तर त्यात साप आणि बेडूकही आश्रयाला आले. त्यामुळे शाळेत येणा-या विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि इतरांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्गात तास सुरू झाला की विद्यार्थ्यांना बेडकांचं डराव डराव सोडून काहीच ऐकू येत नाही. त्यामुळे शिक्षकांनी नेमकं काय शिकवलं, हेच विद्यार्थ्यांना कळत नाही.
पारधच्या जिल्हा परिषद शाळेसमोरच्या डबक्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी पावलं उचलावीत, अशी मागणी केली जाते.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाळ्यात या शाळेसमोर असंच पाणी साचतंय. वारंवार तक्रारींचा पाढा वाचूनही दुर्लक्ष केलं जातंय.. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. आता तरी लक्ष देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शाळेच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
शाळांना सुरुवात झाली असताना शाळेसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. रुवी कदम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. रुवीचे पालक तिच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवतात. ज्यात ते रुवीच्या जीवनातील अनेक आनंदी क्षण सोशल मीडियात अपलोड करत असतात. असाच एक क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शाळा सुटलेली दिसतेय. पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी शाळेच्या गेटवर उभे आहेत. शाळेची घंटा वाजली आणि एक एक मुलं बाहेर येऊन आपल्या पालकांना भेटतंय आणि घरचा रस्ता पकडतंय. पण रुवीच्या बाबतीत याऊलट घडतंय. घरी जाण्याऐवजी पुन्हा शाळेत जाण्यासाठी रुवी रडतेय. ‘तिथे शाळेत जायचे नाही म्हणून बाकीची मुलं रडत होती आणि माझी मुलगी स्कूल सुटले तरी तिला स्कूल ला जायचे होते’, अशी कॅप्शन रुवीच्या पालकांनी व्हिडीओवर लिहिलीय. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. मॅडम आईपेक्षा जास्त लाड करणारी भेटली असे वाटायला लागले आहे, अशी मिश्किल कमेंट एकाने केलीय. नव्वदीच्या मुलांना अर्धी शाळा घरी घ्यायला यायची आणि उचलून घेऊन जायची, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिलीय.वाह! पुढे जाऊन ही मुलगी आयएएस, आयपीएस होणारं, अशी प्रतिक्रियादेखील देण्यात आलीय.काही दिवसांनी हीच शिक्षकांचा क्लास घेईल असे वाटते. शिस्त म्हणजे शिस्त. अशी प्रतिक्रिया एकाने लिहिलीय. घरी एवढा त्रास का देता तुम्ही? आई वडिलांच्या वादाला कंटाळलं असेल बाळ, अशी मिश्किल प्रतिक्रिया एकाने दिलीय. मागच्या आठवडाभरात या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या पाहायला मिळतायत.
Source link
by Hansraj Agrawal | Jun 27, 2025 | Trending News
Gold Rate Today: शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. याचे मुख्य कारण अमेरिकन डॉलरमध्ये आलेली वाढ आणि इस्राइल-ईराण या दोन देशांतील तणाव त्यामुळं सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे. आता गुंतवणुकदारांचे लक्ष महागाईच्या आकड्यांवर आहे. ज्यामुळं फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दराबाबत संकेत मिळू शकतात. त्यामुळं सोन्याच्या दरात मोठे उलटफेर होताना दिसत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरदेखील शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोनं आज 930 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. तर, चांदीदेखील स्वस्त झाली आहे. MCX वर सोनं 1013 रुपयांनी घसरले आहे. तर चांदी 408 रुपयांनी घसरून 1,06,347 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावले आहे. काल चांदीची किंमत 1.06,755 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी घसरून 3,313.23 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. या आठवड्यात सोनं 1.7 टक्क्यांने घसरले आहे. अमेरिकेच्या सोनं वायदादेखील 0.7 टक्क्यांच्या घसरणीसोबत 3.325.70 डॉलरवर पोहोचले होते.
24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 930 रुपयांची घसरण झाली असून 98,020 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 850 रुपयांची घसरण झाली असून 89,850 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 690 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट सोनं 73,520 रुपयांवर पोहोचलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 89,850 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 98,020 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 73,520 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,985 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,802 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7, 352 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 78, 416 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 71, 880 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58, 816 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 89,850 रुपये
24 कॅरेट- 98,020 रुपये
18 कॅरेट- 73,520 रुपये
Source link