Panvel-Karjat Corridor: मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यात येत आहे. या अंतर्गत पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर असा नवा रेल्वे मार्ग विकसीत केला जात आहे. पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉरचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिला एंड अनलोडिंग रेक (ईयूआर रेक) महापे स्थानकात दाखल झाला आहे.
मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) च्या माध्यमातून पनवेल-कर्जत लोकल कॉरिडॉर उभारला जात आहे. पनवेल-कर्जत हा नवीन रेल्वे मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांना एक उत्तम पर्याय मिळणार आहे. नवीन कॉरिडोरमुळं पनवेल आणि कर्जतच्या मध्ये फास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे पवनवेलहून कर्जतल जायचे असल्यास टट्रेन बदलण्याची गरज नाही. या प्रकल्पासाठीचा पहिला एंड अनलोडिंग रेक (EUR) साईटवर पोहचला आहे. लवकरच कर्जत आणि चौक स्थानकांदरम्यान ट्रॅक टाकण्याचे काम सुरू होणार आहे.
या प्रकल्पात वापरण्यात येणारे रेल्वे पॅनेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) ने तयार केले आहेत. प्रत्येक रेल्वे पॅनेलची लांबी 260 मीटर इतकी आहे. याचे वजन प्रति मीटर 60 किलो आहे. पहिल्या टप्प्यात, हे जड पॅनेल महोपे आणि चिखले स्थानकांदरम्यानच्या 7.8 किमी लांबीच्या विभागात बसवले जाणार आहेत.
या प्रकल्पात 3,100 मीटर लांबीचे तीन बोगदे बांधले जात आहेत. त्यापैकी वेव्हरली बोगदा हा सर्वात लांब बोगदा आहे. याची लांबी 2625 मीटर इतकी आहे. याचे काम आधीच पूर्ण झाले आहे. 300 मीटर लांबीचा किरवली बोगद्या आणि 219 मीटर लांबीच्या नाधल बोगद्याचे कामही वेगाने सुरू आहे. या कॉरिडॉरची सर्वात खास गोष्ट म्हणजे बोगद्यांच्या आत बॅलास्ट-लेस ट्रॅक टाकले जात आहेत. यामध्ये न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरण्यात आली आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्मार्ट लाइटिंग सिस्टम, व्हेंटिलेशन, सार्वजनिक आश्रय क्षेत्र आणि बोगदा नियंत्रण प्रणाली यासारख्या सुविधा तयार केल्या जात आहेत.
पनवेल-कर्जत 29.6 किमी लांबीचा लोकल कॉरिडॉर आहे. या म्रगावर पाच स्थानके बांधली जाणार आहेत. पनवेल, चिखले, महोपे, चौक आणि कर्जत अशी ही स्थानके आहेत. या रेल्वे मार्गासाठी 47 पूल बांधले जात आहेत. त्यापैकी 29 लहान आणि 6 मोठे पूल पूर्ण झाले आहेत. महोपे आणि किरवली दरम्यान 4 रोड ओव्हर ब्रिज (ROB) देखील बांधण्यात आले आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम नियोजीत वेळेस पूर्ण झाल्यास 2026 मध्ये या मार्गावर लोकल धावेल. 2,782 कोटींचा हा प्रकल्प आहे.
Sudhir Mungantiwar: ‘लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप करण्यात आला त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नसल्याची माहिती देण्यात आली,’ असा मोठा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात मुनगंटीवारांनी हा गौप्यस्फोट केलाय.
2014 ते 2019 आणि 2022 ते 2024 पर्यंत सुधीर मुनगंटीवार हे मंत्री होते. मात्र, 2024 निवडणुकीनंतर त्यांचे नाव वगळण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’ कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे.
‘मंत्रिपद का नाकारलं याबाबत मला अशी माहिती देण्यात आली की, लोकसभेत स्वत:हून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप आहे. स्वत:हून कोण पराभूत होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, मला लोकसभा लढवायची नव्हती हे मी जाहीर पणे सांगितले पण पराभूत व्हायचं हे कस होईल,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
‘लोकसभेत एकटाच पराभूत झालो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार पराभूत झालेत. तेव्हा वातावरणच तसं होतं. संविधानाच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात जे नरेटिव्ह सेट केले त्यामुळं आम्ही पराभूत झालो. उमेदवार म्हणून लढायचं नव्हतं पण उमेदवार झाल्यानंतर तर मी इतक्या कडक उन्हात फिरलो. पण मी पूर्वतयारी करु शकलो नाही. दिवस कमी होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘मंत्रिपद ज्याने कोणी काढलं असेल किंवा मला मंत्रिपद देऊ नये असं सांगितलं असेल. तर त्यावर उत्तर काय. उत्तम काम करणे. मी माझ्या जिल्ह्यात मिशन ‘ऑलिंपिक 36′ वर काम करतो. माझा उद्देश काय तर ऑलिंपिकमध्ये माझ्या जिल्ह्याचा कोणीतरी मेडल प्राप्त करेल. मी आता या ठिकाणी माझ्या जिल्ह्याच उत्तम उत्तम काम करेन. पंतप्रधानांच्या हस्ते माझ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. राज्य सरकारमध्ये 10 विषयांत नंबर एक आहोत. अजूनही खूप काम करायचंय,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
मंत्रिपद गेल्याची खंत आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, ‘मी जेव्हा माझ्या नातींना मांडीवर घेतो तेव्हा सर्वात जास्त आनंद असतो. मंत्रीपद जाणे येणे हे होतंच आणि कोण पर्मनंट आहे. मंत्रीपद गेल्याची अजिबात खंत नाही,’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
मनोरुग्णांसाठी आधार असणाऱ्या पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. रुग्णालयातल्या खरेदी प्रक्रियेत दीड ते दोन कोटींचा अपहार झाल्याचं समोर आल आहे. आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने सरकारी निधीच्या गैरवापराचा आरोप केला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची कीड पुन्हा अधोरेखित होत आहे.
Maharashtra Weather News : देश पातळीवर हवामानात कैक बदल होत असून, या बदलांमुळं आता नेमका कोणता ऋतू सुरू आहे हाच प्रश्न नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे. गेल्या 24 तासांतील हवामानाचा आढावा घेतल्यास शुक्रवारी एकाएकी सायंकाळच्या वेळी पावसाची सुरुवात झाली आणि परिणामस्वरुप राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये काही अंशी तापमानात घट नोंदवण्यात आली.
सूर्यानं आक ओकण्यास सुरुवात केलेली असतानाच उत्तर भारतातील काही भागांमध्ये झालेल्या या पावसानं नागरिकांना किमान दिलासा मिळाला असला तरीही हा दिलासा फार काळ टिकून राहणार नाही ही वस्तूस्थिती. कारण, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या भागांमध्ये 14 ते 18 मार्चदरम्यान पुन्हा एकदा उष्णता वाढण्यास सुरुवात होईल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
महाराष्ट्रात विदर्भाची सर्वाधिक होरपळ
सहसा होलिका दहनानंतर उकाडा वाढण्यास सुरुवात होते अशी महाराष्ट्रात धारणा असून, सध्या हेच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. कोकण पट्ट्यामध्ये तापमानवाढ झाली असतानाच विदर्भामध्ये पारा 40 अंशांच्या नजीक पोहोचल्यामुळं राज्यात सर्वाधिक होरपळ याच क्षेत्रात होत असल्याचं स्पष्ट होत आहे. इथं ब्रह्मपुरीमध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून, या आकड्यानं उन्हाळ्याच्या पुढील दिवसांच्या चिंतेत आणखी भर टाकली.
दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जिथं चंद्रपूर, अकोला, नागपूर, वर्धामध्ये कमाल तापमानाच 1 ते 2 अंशांची वाढ अपेक्षित आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही उकाडा चांगलाच वाढला असून, नागरिकांना भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा इशारा यंत्रणा देत आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र अपवाद ठरत असून, इथं अद्यापही पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवत आहे. दिवस माथ्यावर आल्यानंतर मात्र हा गारठा नाहीसा होऊन उष्ण वारे नागरिकांना घाम फोडताना दिसत आहेत. एकंदरच महाराष्ट्रावर सध्या तुरळक ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण असल्याचं दिसून आलं तरीही उष्मा मात्र वरचढ ठर्ताना दिसत आहे.
देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये हीच स्थिती असून, समुद्राच्या पृष्ठावरूनही उष्ण वारे वाहत असल्यानं इथंही तापमान वाढीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. दरम्यान बाष्पीभवनाची प्रक्रिया आणि समुद्र क्षेत्रामध्ये वाऱ्याच्या दाबामध्ये सातत्यानं होणारे बदल पाहता तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मात्र पावसाचीही हजेरी दिसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं उत्तरेकडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मात्र पावसानं हजेरी लावली असून, हवामान विभागानं या भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे, तर पर्वतीय भागांसाठी हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Nashik Crime News : पैसा सुरक्षित राहावं म्हणून तो आपणं बँकेत ठेवतो.. शिवाय, बँकेच्या इतर योजनांमधून ठेवींवर अतिरिक्त नफा मिळावा असाही अनेकांचा हेतू असतो. नागरिक आपल्या मेहनतीची जमापुंजी निर्धास्तपणे बॅंक खात्यात जमा करतात. पण बँकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच तुमची फसवणूक झाली तर? हो असंच काहीसं झालंय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव भागात. बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला आहे.
कळवण भागातील ॲक्सिस बँकेतील कर्मचारी तुषार गोसावीनं ललिता मोरे या ग्राहकाकडून बँकेतील व्यवहारांसाठी तूषारनं एटीएम, मोबाईल बँकींगची माहीती घेतली. दरम्यान त्यांनं ग्राहकाची एकूण 15 लाखांची फसवणुक केली. तर दुसरीकडे मालेगावमध्ये आकाश नामदेव इंडाईत यानं महिला बचत गटाचे खोटे कारण सांगून सहीचे, रक्कम नसलेले कोरे चेक घेतले. त्यातून पैसे काढून काही रक्कम त्याने ईएमआय स्वरूपात मनमाड शाखा येथे भरली. त्यापैकी 19 लाख 28 हजार 407 रुपयाची रक्कम अद्याप भरली नाही.. पोलिस या सगळ्याचा तपास करत आहेत.
फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?
बँकेतील कर्मचारी थेट तुमच्या घरी येऊन तुम्हाला थेट व्यवहाराच्या सोयी उपलब्ध करून देत असेल तर सावधन व्हा. तुमच्या बँकेतील अकाउंटमध्ये एफडी करण्यासाठी तुमच्या घरी येत असतील तर त्यांच्या आमिशाला बळी पडू नका. तुमचं डेबिट कार्ड आणि मोबाईल अॅप सुरू करून देण्याच्या नावानं पासवर्ड मागत असतील तर देऊ नका. अशा प्रकरणांमध्ये लोकांचे कोट्यावधी रुपये लुटण्यात आलेत. अनेकांना अद्याप ते मिळाले नाहीत त्यामुळे बँकेतील व्यवहार करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी सांभाळूनच व्यवहार करा.. अन्यथा तुमचे बँक खाते साफ होण्यास वेळ लागणार नाही.