Sandipanrao Bhumre Liquor License Row : शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे…भुमरेंची भावजय आणि पीएच्या देशी दारू दुकानांच्या परवान्यांवरून गंभीर आरोप करण्यात करण्यात आलेत. या देशी दारू दुकानांना एकाच दिवसात परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुमरेंच्या दारू दुकांना वायूवेगानं परवानगी कशी मिळते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
छाया भुमरे यांनी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर स्वयंघोषणापत्र सादर केले. त्याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी छाया भुमरे यांच्या परवान्याबाबत घेतलेला ठराव वैध आहे का, याची विचारणा करणारे पत्र गंगापूर गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी त्याच दिवशी हा अर्ज वैध असल्याचं टपालानं कळवलं. या अर्जावर अतिशय झटपट म्हणजे दुसऱ्या दिवशी रोजी राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षकांनी समक्ष जबाब घेतल्याची स्वाक्षरी केली. विशेष म्हणजे त्याच्या आठ दिवसांपूर्वीच छाया भुमरे यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतल्या ओशिवरा व्हिलेजमधील डिसोझा बारचा नूतनीकरण केलेला परवाना स्थलांतर करण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या आठ दिवसांत त्यांना परवाना मिळाला.
दारुच्या दुकानासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागली. 13 ऑक्टोबर 2023रोजी छाया भुमरेंचा देशी दारुच्या किरकोळ दुकानासाठी ठराव पांढर ओहळ ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर. 8 डिसेंबर 2023 रोजी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर घोषणापत्र सादर झाले. 8 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क अधिका-यांकडून परवान्याबाबतचा ठराव वैध आहे का याची विचारणा झाली. 8 डिसेंबर गटविकास अधिका-यांकडून टपाली अर्ज वैध ठरवण्यात आला. 9 डिसेंबर 2023 रोजी उत्पादन शुल्क उपाध्यक्षांची समक्ष जबाबावर स्वाक्षरी झाली.
भुमरेंच्या दारू दुकानांना वायुवेगानं परवानगी मिळाल्यावरून आमदार रोहित पवारांनी निशाणा साधला. सर्वसामान्य लोकांसाठी यंत्रणा इतक्या वेगानं काम करणार का, असा सवाल पवारांनी केलाय. इतरांना दारू दुकानाच्या परवान्यांसाठी वर्षभर खेटे मारावे लागतात. मात्र भुमरेंना एका दिवसात परवाने देण्याची कृपा कशी झाली असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय.
दारू दुकानांना अवैधपणे एका दिवसात मान्यता देण्यात आली. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. दारू परवान्यांवरून विरोधकांनी संदीपान भुमरेंना कोंडीत पकडलंय. येत्या काळात यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे..या प्रकरणात भुमरे आता काय स्पष्टीकरण देणार, याकडे लक्ष लागलंय.
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात फॅमिली ड्रामा पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधू एकत्र आलेत. तब्बल 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र त्यापाठोपाठ आता रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. सुनील तटकरेंच्या वाढदिवसा निमित्तानं तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय. आधी पवार, नंतर ठाकरे आणि आता तटकरे कुटुंब एकत्र आले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेला दुरावा संपवून पवार कुटुंब अनेकदा एकत्र आलं. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत आणि आता सर्व मतभेद सारून रायगडमध्ये तटकरे कुटुंबही एकत्र आले.
राजकारणात गेल्या 12 वर्षांपासून तटकरे कुटुंबीयांत निर्माण झालेला दुरावा अखेर दूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त तटकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. एकेकाळी एकत्र असणारं तटकरे कुटूंब राजकीय मतभेदांमुळे एकमेकांचे राजकीय वैरी बनले होते.
माजी आमदार आणि सुनील तटकरेंचे मोठे बंधू अनिल तटकरे यांनी वेगळी चूल मांडली तर माजी आमदार आणि पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेना व नंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानं ही दरी अधिकच वाढली होती. बारा वर्षांत दोन्ही कुटुंबाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. मात्र, सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्तानं हे सर्व कुटुंबीय एकत्र आलेत. त्यामुळे तटकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं…मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील कुटुंबीयांचं स्वागत केलं आणि मग रंगली ती आनंदाची मैफिल.
महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेचे दाखल देशभर दिले जातात. राजकीय मतभेद असले तरी कुटुंब एकत्र ठेवणं ही राज्याची राजकीय संस्कृती आहे. गेल्या काही दिवसांपासून याच राजकीय संस्कृतीचं दर्शन होताना दिसतंय.त्यामुळेच राजकीय मतभेद असतानाही पवार, ठाकरे आणि आता तटकरे कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळत आहे.
Weather Update: नागपूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, तितकासा पाऊस झाला नसताना आता आज गुरुवारी पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पाऊस कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे. दरम्यान उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने कोकणात हाहा:कार माजवला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता आहे. त्यानंतर विदर्भातही पावसाने जोर धरला. अकोला, वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
पावसाळ्यात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान
एकीकडे मुसळधार पाऊस पडत असतानाच अलिबाग येथे बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबागमध्ये 32.1 अंश सेस्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. इतर भागात कमाल तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले होते.दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी
गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात, जिथे पावसामुळे वाहतूक, शाळा, कार्यालय यांच्यावर मोठा परिणाम होतो. तिथे हवामान अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचं दिसत आहे. 2020 ते 2024 या चार वर्षांत मुंबईतील मुसळधार पावसाचा फक्त 46 टक्के अंदाज अचूक ठरला आहे. याच माहितीनुसार, 41 टक्के अंदाज पूर्णतः चुकीचे होते. अनेक वेळा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. तर कधी अंदाज दिलाच गेला नाही. आधुनिक तंत्रज्ञान असूनही अंदाज चुकत असल्याने हवामान खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Uddhav Thackeray : मराठी माणूस आणि गिरणी कामगारांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत. शिवसेना UBTआणि मनसेनं गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं गिरणी कामगारांच्या आजझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा दिला. गिरणी कामगारांना मुंबईत हक्काची घरं द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय.
शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं?
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर कायम एक आरोप होतो शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं. हा आरोप अर्थातच खोटा आहे. माझं सरकार जर यांनी पाडलं नसतं तर, साहजिकच यांना सर्व गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, पोलिसांनादेखील घरं द्यायला सुरुवात केलीच होती. पण विशेषत: गिरणी कामगारांना मुंबईत घरं दिली असती. आज आमची हीच मागणी आहे, एका बाजूला गिरणी कामगार हा मुंबईबाहेर फेकला जातोय. त्यांना सेलू आणि वांगणीला पाठवलं जातंय. धारावीच्या माध्यमातून अदानींना अख्खे मुंबई आधण दिली जातेय.
तर आमची मागणी आहे की, गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या आणि अदाणींचं टॉवर सेलू आणि वांगणीला उभी करा. जाऊ द्या देवनार डम्पिंग ग्राउंडवर अदानीने टॉवर उभारले तरी काही हरकत नाही. त्यांना तिथं टॉवर हवं तर करुन द्या. नाही तरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालाच आहे. तो टीडीआर त्यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवर आणि शेलू, वांगणीवर वापरावा. पण ज्यांनी हक्काने मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे पाठवण्याऐवजी त्यांना धारावीत घरं द्या. आदानीला कुर्ला मदर डेरीची जमीन दिली आहे, तिथे गिरणी कामगारांना घरे द्या. आणि अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही.
शिक्षकांच्या आंदोलनावर काय बोलले उद्धव ठाकरे?
विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे म्हणाले की शिक्षकांना आम्ही न्यायासाठी सोबत असल्याचे वचन दिलं आहे. कामगारांचा संप अजूनही तांत्रिक दृष्ट्या सुरू आहे. त्यांना इतर काम देऊन वेडवाकडं वापरून घेतात. मराठीचा मुद्दा आता गरम झालाच आहे. फक्त हिंदी सक्तीचा जीआरला विरोध करुन चालणार नाही. मराठी माणूस आता एकवटला आहेच. आमचा कोणता भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे.
मराठी माणसाच्या मुळावर येणा-यांना मुळासकट उखडून टाकू!
मराठी माणसासाठी आम्ही ठाकरे बंधू शनिवारी एकत्र आलो असं उद्धव यांनी म्हटलं. मराठी माणसाच्या मुळावर येणा-यांना मुळासकट उखडून टाकू असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिलाय.
Maharashtra Politics : ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर महायुती अलर्ट झाली असून ठाकरेंना शह देण्यासाठी मिशन पालिका सुरू केल्याची माहिती आहे. विविध समुदायाच्या लोकसंख्येनुसार पालिका निवडणुकांचा फार्म्युला ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन महिन्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती देखील अलर्ट मोडवर आली. ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मिशन महापौरची घोषणा करण्यात आलीय, मुंबईतील विविध समुदायाची टक्केवारीनुसार महायुतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता आहे.
महायुतीचा कोणता फॉर्म्युला?
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पालिका निवडणुकीत मराठी- अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापासून महायुती उमेदवारांसाठी सर्व्हे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे अमराठी मतांची जबाबदारी असल्याची माहिती आहे. दादांच्या राष्ट्रवादीकडे बहुजन मतांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदेंच्या शिवसेनेकडे मराठी मतं वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. त्यामुळे मराठी आणि अमराठी असा मुद्दा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे. मात्र, याच मुद्द्यावरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांनी भाजपर निशाणा साधलाय. भाजपला राज्यात हिंदी-मराठीचं नरेटिव्ह सेट करायचाय असा आरोप सावंत यांनी केला. मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी झाली. तर, अमराठी माणसांची संख्या मागील काही दिवसात वाढलीय. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरच पालिका निवडणुका लढवल्या जाणार असल्याची शक्यता आहे.
मुंबईत कोण किती टक्के?
मुंबईत 32 टक्के मराठी माणसं आहेत. 14 टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे. इतर अमराठींची संख्या ही 54 टक्के आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता. दरम्यान शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई पालिकेसाठी मिशन महापौर राबवण्यात येतंय. त्यामुळे महायुतीचा या मिशनचा किती फायदा होणार? हे पालिका निवडणुकीनंतरच समोर येणार आहे.